आर्थिक साक्षरतेकडून आर्थिक सक्षमीकरणाकडे महिलांचा प्रवास! महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
01-Mar-2025
Total Views | 28
मुंबई : आर्थिक साक्षरतेकडून आर्थिक सक्षमीकरणाकडे महिलांचा प्रवास सुरू असून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला उद्योजकतेकडे वळत आहेत, असे मत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.
शुक्रवार, २८ फेब्रुवारी वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे रोजी झेप फाउंडेशनच्यावतीने विकसित भारत महिला उद्योजिका २०२५ या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक फरोग मुकादम, उपायुक्त डॉ. प्राची जांभेकर, नगरसेविका हर्षिता नार्वेकर, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या कार्यकारी संचालक रूपा नाईक, ‘झेप’च्या संचालिका पौर्णिमा शिरीषकर यांच्यासह बचत गटाच्या महिला आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, "आर्थिक साक्षरतेकडून आर्थिक सक्षमीकरणाकडे महिलांचा प्रवास सुरू आहे. या प्रवासात झेप फाउंडेशनचे मोलाचे सहकार्य आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीद्वारे बचतगटाच्या माध्यमातून महिला उद्योजकतेकडे वळत असून लाडक्या बहिणी लाडक्या उद्योजिका बनत आहेत. जागतिक महिला दिन हा स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा आहे. यानिमित्त झेप फाउंडेशनने ५०० पेक्षा जास्त बचत गटाच्या महिलांना एकत्रित केले आहे. दोन कोटीपेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. ग्रामीण भागातील महिलेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी या योजनेचा लाभ महत्वपूर्ण ठरत असून या योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी महिलांचा आपण आधार होऊ शकतो याचे समाधान आहे," असे त्या म्हणाल्या. तसेच कुटुंबातील महिलांचे योगदान वाढावे यासाठी हा प्रयत्न असून गरजू महिलांना सहकार्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लघु उद्योगात ७० टक्के महिला कार्यरत - अश्विनी भिडे
यावेळी बोलताना प्रधान सचिव अश्विनी भिडे म्हणाल्या की, "जिद्द आणि महत्वाकांक्षा असेल तर महिलासुद्धा आपले ध्येय गाठू शकतात. लघु उद्योगात ७० टक्के महिला कार्यरत आहेत. राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना उद्यमशील बनवू शकतो. महिलांसाठी आकाश मोकळे असून त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम राज्य शासन करत आहे. केवळ महिलांच्या महत्वाकांक्षा आणि जिद्दीने हे साध्य होणार आहे," असे त्या म्हणाल्या.