वैद्यकीय क्षेत्रातील सुभेदार...

    08-Feb-2025
Total Views |

DR. TANAJI CHAVAN
 
गरिबीचे चटके सहन करत, अत्युच्च पदावर विराजमान होताना शिक्षणाची कास धरून,पीडितांना मदतीचा हात देणार्‍या डॉ. तानाजी जगराम चव्हाण यांच्याविषयी...
 
हेल्थ सर्विस मॅनेजमेंट’ची पदवी, ‘पब्लिक हेल्थ’ पदवी, ‘डिप्लोमा इन फॅमिली प्लॅनिंग’, ‘एलएलबी’, ‘लेबर लॉ’, ‘लेबर वेल्फेअर’, ‘एमबीए’, ‘जर्नालिझम’, ‘डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सायकॉलॉजी’, ‘मास्टर्स इन पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’, ‘डिप्लोमा इन ह्युमन राईट्स’, ‘डिप्लोमा इन फार्मर प्रोड्युसर कंपनी’ इतक्या सार्‍या पदव्या, एका राजपूत बंजारा समाजातील तांड्यावर राहणार्‍या अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुराच्या मुलाच्या नावापुढे आहेत. डॉ. तानाजी जगराम चव्हाण असे त्या पदवीवेड्या मुलाचे नाव. आपल्या बापाचे नाव मोठे करणारा डॉ. तानाजी हा आता, नाशिक महानगरपालिका येथे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी म्हणून स्थिरावला आहे. त्यांचे मूळ गाव नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी.
 
दुष्काळी भाग असल्याने, या भागातील सर्वजण ऊसतोडणीला जातात. तरीही परिस्थितीवर मात करत, त्यांच्या कुटुंबातील सगळेच मोठ्या हुद्द्यावर आहेत. चव्हाण यांचे मोठे काका डॉक्टर, चुलतभाऊ पुणे आणि औरंगाबाद विद्यापीठात परीक्षा नियंत्रक , दुसरे काका इंजिनिअर आहेत. त्यांच्याबरोबरच घरातल्या सुनादेखील मोठ्या पदावर कार्यरत आहेत. डॉ. तानाजी यांचा एक भाऊ तालुका आरोग्य सुपरवायझर, तर दुसरा औषध कंपनीत व्यवस्थापक आहे. त्यांच्या पत्नीही छत्रपती संभाजीनगर येथे, जीएसटीमध्ये सेल्स टॅक्स इन्सपेक्टर आहेत. डॉ. तानाजी यांचे प्राथमिक शिक्षण, न्यायडोंगरी गावातील एका तांड्यावरील शाळेत झाले. दहावीपर्यंत गावातल्याच शाळेत, तर बारावीपर्यंतचे शिक्षण चाळीसगाव येथे झाले. कॉलेज करत असतानाच चाळीसगावच्या स्थानकाजवळच असलेल्या कटलरीच्या दुकानात, १५० रुपये महिन्याने काम केले. संध्याकाळी गावी जाताना, रेल्वेतच अभ्यासासाठी वीज असलेली जागा त्यांना उपलब्ध करून दिली जायची. डॉ. तानाजी यांच्या आईवडिलांनी प्रसंगी कर्ज घेऊन उसनवारीही केली. परंतु, त्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. बारावीनंतर प्रवरानगर येथे मेडिकलसाठी त्यांचा नंबर लागला. वसतिगृहाची फी परवडणारी नसल्याने, कॉलेजपासून तीन ते चार किलोमीटरवर १५० रुपये महिन्याने खोली भाड्याने घेतली. आपला भाऊ एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे, म्हणून त्यांच्या आतेभावाने त्यांना बुट घेऊन दिले. त्याआधी डॉ. तानाजी यांच्या पायाला, टाचेजवळ चंद्रकोर झालेली पॅरेगॉनची चप्पल माहिती होती. मेडिकलची फी भरण्यासाठी त्यांच्या काकांनी पैशांची मदत केली, तर डॉ. तानाजी यांच्या लहान भावाने स्वतःच्या शिक्षणाला तिलांजली दिली. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी त्याने पडेल ते काम करत, डॉ. तानाजी यांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च केले.
 
डॉ. तानाजी यांची आर्थिक ओढाताण लक्षात घेऊन, त्यांचे मामा महिन्याला ५०० रुपये देत गेले. यामुळे त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय झाली. असे करत १९९५ साली त्यांनी ’एमबीबीएसला प्रवेश घेतला., २००३ मध्ये ‘साई संस्थान’ येथे पहिल्यांदा प्रशिक्षणार्थी म्हणून, डॉ. तानाजी कामाला लागले, तर २००४ मध्ये शासकीय नोकरी नांदगाव तालुक्यातीलच बोलठाण येथे लागली. पुढे आपल्या मूळ गावी त्यांची बदली झाली. पुढे डॉ. तानाजी नांदगाव येथे तालुका आरोग्य अधिकारी म्हणून रुजू झाले. यादरम्यान तालुक्यामध्ये कोठेही गरज असेल, तेव्हा त्यांनी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या. आतापर्यंत डॉ. तानाजी यांनी, सात ते आठ हजार शस्त्रक्रिया केल्या आहेत. नंतर चाळीसगाव तालुक्यामध्ये, आरोग्य अधिकारी म्हणूनही काम केले. तेथेही त्यांनी जळगाव, पाचोरापर्यंत जात शस्त्रक्रिया केल्या. पत्नीला माझगाव येथे नोकरी लागल्याने डॉ. तानाजी यांनी आपली बदली ठाणे येथे करून घेतली. यादरम्यान कल्याण, बदलापूर येथे आरोग्य अधिकारी म्हणून काम केले. कोरोना काळात डॉ. तानाजी यांनी, नाशिकच्या संदर्भ रुग्णालयात बदली करून घेतली. तर २०२३ साली, नाशिक महापालिका येथे आरोग्य अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. ‘एमबीबीएस’नंतर पुढे डॉ. तानाजी यांना, ‘एमडीएमएस’ करण्याची इच्छा होती. पण, परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही. घरचा आर्थिक भार उचलण्यासाठी नोकरी करणे क्रमप्राप्त असल्याने, त्यांना नोकरी पत्करणे भाग पडले. बरीच वर्षे नोकरी केल्यानंतर डॉ. तानाजी आता स्थिरस्थावर झाले आहेत. परंतु, शिकण्याची इच्छाशक्ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळेच त्यांनी ‘इंडस्ट्रियल हेल्थ डिप्लोमा’साठी प्रवेश घेतला आहे. शिक्षणाची गंगा वाड्या वस्त्यांवर पोहोचावी यासाठी त्यांनी, डॉ. तानाजी यांच्या आजोबांनी सुरु केलेल्या ‘भिका लखामा शिक्षण प्रसारक मंडळ’ या शिक्षणसंस्थेचे पुनरुज्जीवनही त्यांनी केली. आपल्यासारख्याच गरीब मुलांना शिक्षणाची कवाडे सताड उघडी करून देत, अनेक प्रज्ञावंत घडविण्याचे काम ही संस्था करत आहेत. अडचणीत सापडलेल्यांना मदत करताना ते सांगतात की, “मी एक एक रुपयासाठी खूप तरसलो आहे. त्यामुळे मी माझ्याकडे कोणीही विधवा, परित्यक्या आल्यानंतर लागेल ती मदत त्यांना करतो. मदत केलेले पैसे परत कधीच मी घेत नाही. अजूनही मदतीसाठी आलेल्यांना रिकाम्या हाताने परत न पाठवणार्‍या डॉ. तानाजी जगराम चव्हाण यांना, निरोगी आयुष्य लाभण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून आदरपूर्वक शुभेच्छा!
 
 
विराम गांगुर्डे