मुंबई : (Ladhidevi Ramdhar Maheshwari Night College) राजस्थानी संमेलन शैक्षणिक संस्थेच्या लधिदेवी रामधर माहेश्वरी नाईट कॉलेज ऑफ कॉमर्सने दि. २२ फेब्रुवारी रोजी "सेव्ह फूड" या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण केले. हा सादरीकरणाचा कार्यक्रम मालाड पश्चिम येथील पोलिस चौकीसमोरील हनुमान मंदिराजवळ आयोजित करण्यात आला होता. डीएलएलई विस्तार समन्वयक डॉ. सूर्यभूषण मिश्रा आणि प्रा. श्वेता चावडा यांनी या कार्यक्रमाचे नेतृत्व केले. प्राचार्य डॉ. प्रीती ओझा आणि फील्ड समन्वयक प्रा. सुलभा रावराणे तसेच आरएसईटी व्यवस्थापन सदस्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्दिष्ट "सेव्ह फूड" या विषयावर पथनाट्याद्वारे अन्नाचे महत्त्व अधोरेखित करणे, अन्नाचा अपव्यय टाळण्यासाठी जनजागृती करणे, हे आहे. या अन्नाची नासाडी हा फक्त सामाजिक प्रश्न नसून पर्यावरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे अन्न सेवनाबद्दल लोकांमध्ये जागरूकता सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा हेतू समोर ठेवून या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.
अन्नाची नासाडी म्हणजे फक्त अन्न वाया घालवणे नव्हे तर धान्य, फळ-भाज्या पिकवण्यासाठी लागलेली मजूरी, श्रम, गुंतवणूक आणि स्त्रोतांचे नुकसान आहे. म्हणूनच अन्नाची बचत आणि अन्नाच्या नासाडीचा समाज आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. लधिदेवी रामधर माहेश्वरी नाईट कॉलेजकडून "अन्न वाचवा, अन्नाची नासाडी करू नका", या विषयावर प्रबोधनात्मक स्वरुपात पथनाट्य सादर करण्यात आले. त्यामुळे हा उपक्रम चांगल्या भविष्यासाठी अन्न व्यवस्थापनासाठी शाश्वत दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणारा ठरणार आहे.