हेतू शुद्ध असला की स्पष्टीकरणे द्यावी लागत नाही!

    25-Feb-2025
Total Views | 319

Editorial on actor amol kolhe clarification on swarajyarakshak sambhaji serial ending
 

छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र मांडण्याचा उद्देश काय, हे सुस्पष्ट असले तरी त्याला वादाची किनार लागत नाही. संभाजी महाराजांचा धर्माभिमान लोकांसमोर न्यायचा की, अनाजीपंतांचे कपट, हा ज्याच्या-त्याच्या संस्कारांचा प्रश्न...
 
‘सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नहीं’ अशा आशयाची हिंदीत एक म्हण आहे. सोशल मीडियाच्या आजच्या काळात आपल्यापैकी अनेकांना व्हॉट्सअ‍ॅपवरून या संदेशाची चित्रे आलीही असतील. आज त्याचे आठवण यायचे कारण म्हणजे, खा. अमोल कोल्हे त्यांच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेवरून देत असलेली केविलवाणी स्पष्टीकरणे. औरंगजेबाने केलेला छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ व क्रूरकर्मा औरंगजेबाचे त्या प्रसंगाने घडणारे विकृत दर्शन परिणामकारकपणे या मालिकेत दाखवले गेलेले नाही. ‘छावा’च्या यशानंतर औरंगजेबाचा खरा चेहरा व तो दिसू नये, म्हणून पाखंडी पुरोगाम्यांचे प्रयत्न ऐरणीवर आले आहेत व लोक प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. आधी कोल्हे म्हणाले, ‘दबाव होता’, आता म्हणतात, ‘हा फेक नॅरेटिव्ह आहे. शरद पवारांनी कोणताही दबाव आणला नाही,’ असेही ते स्वत:च म्हणाले. ‘फेक नॅरेटिव्ह’वरच सत्ता स्थापन करणार्‍यांच्या सोबत उभे राहिले की, एक दिवस ‘फेक नॅरेटिव्ह’मुळेच बळी पडावे लागते. शिवप्रभूंच्या पराक्रमी आणि धर्माभिमानी सुपुत्राचा अभिनय करणे सोपे, मात्र तशी परिस्थिती आल्यावर तत्त्वनिष्ठ राहणे तितकेच अवघड!
 
कोणे एकेकाळी एकता कपूरच्या हिंदीतील सुमार मालिकांशी मराठीतील त्याहून अधिक सुमार मालिकांनी स्पर्धा करायला सुरुवात केली होती. त्यातून मराठीला ही अशी अनेक नररत्ने गवसली. मालिका बंद पडल्या. पण, मराठी श्रोत्यांची या मंडळींकडून सुटका काही झाली नाही. अमोल कोल्हेही अशाच मालिकांमधून मराठी रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचलेले. रामदास स्वामींची शिवस्तुती, महात्मा जोतिबा फुलेंचा पोवाडा, लोकमान्य टिळकांची शिवजयंती, भालजी पेंढारकरांचे चित्रपट, शिवाजीराव भोसले, बाळशास्त्री हरदास, निनाद बेडेकर यांच्यासारख्यांची व्याख्याने, बाबासाहेब पुरंदरेंचे ‘जाणता राजा’ हे महानाट्य, यातून महाराष्ट्राचे समाजमन आकाराला आले आहे. शिवछत्रपतींचा स्वदेश, स्वधर्म याविषयीचा स्वाभिमान, तर संभाजी महाराजांची बेधडक वृत्ती व धर्मांतरण नाकारून केलेले बलिदान, ही महाराष्ट्राची अस्मिता झाली आहे.
 
 शिवछत्रपतींसारखे लोकोत्तर महापुरुष कालचक्राची गती उलटी फिरवतात. मनसबदार्‍या, इनामदार्‍या राखून स्वत:च्या चार पिढ्यांचे भले करणार्‍या सरदारांच्या काळात सार्वभौम, स्वायत्त व स्वतंत्र हिंदू साम्राज्य उभे करण्याचे स्वप्न पाहणारे छत्रपती शिवाजी महाराज पुढच्या कित्येक पिढ्यांना स्मरण होत राहते. पुस्तके, चित्रपट, मासिके या स्वरूपात ही आठवण पुन्हा पुन्हा होत राहते व शिवचरित्र पुढच्या पिढीला प्रेरणा देत राहते. शिवचरित्र साकारणार्‍यांची व्यक्तिमत्त्वे, जिजाऊ आईसाहेबांना साकारणारी व्यक्तिमत्त्वे, नायक, खलनायक सगळेच मराठी रसिकप्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात व मनावरही कोरले जातात. भालजींनी शिवप्रभूंचा प्रेरणादायी इतिहास अनेक चित्रपटांतून मांडला. सूर्यकांत मांढरे, चंद्रकांत मांढरे या भरदार शरीरयष्टीच्या देखण्या नटांनी त्यांच्या चित्रपटांत शिवप्रभूंच्या भूमिका साकारल्या. कोणतेही वाद नाहीत, विवाद नाही, जातीपातीचे राजकारण नाही, धर्माभिमानी संवादफेक, अंगावर शहारा येतील अशी दृष्ये व इतिहासाचे सम्यक स्मरण, यामुळे ‘युट्यूब’सारख्या नवमाध्यमांवरही भालजींच्या चित्रपटांचा प्रेक्षक कमी झालेला नाही, तो काही लाखांत आहे. याचे खरे कारण हे भालजींनी चित्रपटाच्या सुरुवातीला केलेल्या त्यांच्या निवेदनात आहे.
 
 चित्रपटाच्या प्रारंभीच भालजींचे निवेदन येते. अगरबत्त्यांच्या धुरात पुढील वाक्ये आपल्या स्क्रिनवर दिसतात- “माननीय महाशय, हा कलेचा विलास नव्हे, तशीच ही केवळ करमणूक नाही. त्या युगप्रवर्तक पुरुषोत्तमाची त्याच्या भक्ताने मांडलेली ही पूजा आहे.” दृक्श्राव्य माध्यमाचा वापर करण्याचा हेतू शुद्ध असला की, वादाची किनार लाभण्यापेक्षा त्यामागचा उद्दात हेतूच यशस्वी होताना दिसतो. शिवछत्रपतींचे चरित्रच असे लालित्यपूर्ण की, छत्रपतीच काय, औरंगजेब साकारणारे खलनायकही अजरामर होऊन जातात. प्रभाकर पणशीकर ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकात औरंगजेबाची भूमिका साकारत असत. तो कपटी, खुन्शी, धर्मवेडा म्हातारा वयाच्या सत्तरीत कसा विकृत होत गेला होता, हे पाहण्यासाठी ‘इथे ओशाळला मृत्यू’च्या नाट्यप्रयोगाला रसिकप्रेक्षक गर्दी करत असत.
  
नंतर काळ आला तो महाराष्ट्राच्या इतिहास, भूगोल, लोकसंस्कृतीच्या विकृतीकरणाचा. एका जातीला दुसर्‍या जातीच्या विरोधात उभे करून मते मिळवण्याचा. अशावेळी शिवछत्रपतींसारखी हिंदू धर्माभिमानी व्यक्तिमत्त्वे अडचणीची असतात. मात्र, शिवप्रभूंचे जीवितकार्य असे की, त्यांच्या मृत्यूपश्चातही मराठे आणि महाराष्ट्राने आपला धर्माभिमान आणि राष्ट्रीय बाणा सोडला नाही आणि औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीतच मिळवले. पण, असा इतिहास सांगितला की, तो धर्मांध मुसलमानांना उघडे पाडतो. हिरव्या मतपेढ्या कोरड्या पडायची भीती वाटते. मग पद्धतशीरपणे हा इतिहास अगोड करण्याचे प्रयत्न राबविले जातात. विकी कौैशलच्या ‘छावा’ने औरंगजेबाचे क्रौर्य आणि धर्मवेडेपणा बेदरकारपणे देशासमोर आणला. स्वत:ला ‘पुरोगामी’ म्हणविणार्‍यांची गोची इथे सुरू झाली.
 
अमोल कोल्हेंची ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका कितीतरी काळ अनाजीपंतांभोवती फिरत होती. त्यातून समाजमाध्यमांमध्ये त्यातल्या क्लिप्स प्रसारित करणे, त्यातून प्रेरणा घेऊन देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख ‘अनाजीपंत’ असा करणे, अशा कितीतरी गोष्टी झाल्या. अमोल कोल्हेंनी यावर कधीही आक्षेप नोंदवला नाही. उलट त्यांची मालिका या भोवतीच फिरत राहिली. दरम्यान त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदारकी मिळाली. खरे तर लोकजनमानसाने संभाजी महाराजांना जी उपाधी लावली, ती म्हणजे ‘धर्मवीर.’ हिंदू धर्माचा हा ‘धर्मवीर’ कोल्हेंनी ‘स्वराज्यरक्षक’ केला. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदुत्वापासून दूर करण्याचे व एक सेक्युलर राजा म्हणून पेश करण्याचे अनेक केविलवाणे प्रयत्न यापूर्वीही झाले आहेत.
 
मात्र, महाराजांचे कर्तृत्व इतके मोठे की, त्यांना हिंदुत्वापासून दूर करता येत नाही. स्वराज्यातील मुसलमान, शिपाई, गागाभट्ट या आणि अशा कितीतरी गोष्टी यशस्वी करण्याचा व विकृत पुस्तके लिहून छत्रपतींच्या इतिहासाच्या मोडतोडीचा प्रयत्न सातत्याने चालूच असतो. महापुरुषांच्या कुटुंबातला गृहकलह ही अत्यंत दुर्दैवी बाब. प्रभू श्रीरामालाही गृहकलहामुळे वनवासात जावे लागले. योगेश्वर भगवान श्रीकृष्णालाही रक्ताच्या मामाकडून धोका असल्यामुळे जन्मदात्या आईपासून दूर जावे लागले. दुर्दैवाने, शंभूराजांच्याही आयुष्यात तसे प्रसंग आले. अनाजीपंत व बाकी कारभारी यांनी जे केले, त्याची शिक्षा छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना तिथल्या तिथे दिली होती. पुढचा इतिहास थोरली पात, धाकली पात हा सर्वश्रूत आहे. इतके सारे होऊनही, संभाजी महाराजांनंतरही शिवछत्रपतींची प्रेरणा घेऊन मराठे हिंदू धर्मासाठी लढत होते. मात्र, विकृतांना सदैव दिसतो तो अनाजीपंत! धर्माचे अधिष्ठान मानून मराठ्यांनी देशकारण केले. शिवलिंग हाती धारण करून राज्य करणार्‍या अहिल्याबाई या त्याच परंपरेतल्या. बारा बलुतेदार आणि अठरापगड जातींच्या छत्रपतींवरील श्रद्धेचा इतिहास हाच महाराष्ट्राचा इतिहास आहे, तोच महाराष्ट्रधर्म आहे.
 
अल्लाउद्दीन खिलजीशी झुंजलेले देवगिरीचे यादव ते पानिपतावर अहमदशाह अब्दालीला नडलेले पेशवे, शिंदे, होळकर, विंचूरकर हाच महाराष्ट्रधर्म आहे. मात्र, तो सांगायला लागले की, अल्लाउद्दीन खिलजीपासून औरंगजेबापर्यंत आणि औरंगजेबापासून अहमदशाह अब्दालीपर्यंत, खलनायक समोर यायला लागतात. वाघनखे आली, भवानी तलवार आणण्याच्या गोष्टी सुरू झाल्या, ‘जाणता राजा’सारखे महानाट्य यशस्वी झाले, ‘छावा’सारखा चित्रपट यशस्वी झाला, की इतिहासाचा काथ्याकूट आणि तो इतिहास सिद्ध करण्यासाठी शोधून काढलेले पुरावे आणि त्या पुराव्यांचा लावलेला सोयीचा अर्थ, ही रीतच होऊन बसली आहे. सिंहाचे अस्तित्व थोडेसे जरी धूसर झाले, तरी जंगलावर राज्य आपले आहे, असे कोल्ह्या-कुत्र्यांना वाटायला लागते. शिवछत्रपतींचे कर्तृत्व व धर्मवीर संभाजी महाराजांचे बलिदान, या ब्रिगेड्यांना कधी ‘छावा’च्या निमित्ताने, तर कधी खुद्द संभाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रांनी सणसणीत चपराक देते. ‘यावत् चंद्र दिवाकरौ’ या पराक्रम आणि बलिदानाचे पोवाडे गायले जातील आणि बेगड्यांचे बुरखे फाटत राहतील, यात शंका नाही!


 
अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121