कासवांची स्वारी रत्नागिरीच्या किनारी; जिल्ह्यातील सागरी कासव विणीच्या किनार्‍यांमध्ये वाढ

    10-Feb-2025
Total Views | 202
konkan sea turtle




मुंबई (अक्षय मांडवकर) -
रत्नागिरीतील समुद्री कासव विणींच्या किनार्‍यांमध्ये यंदा नव्या किनार्‍यांची भर पडली आहे (konkan sea turtle). जिल्ह्यातील चार किनार्‍यांवर यंदा प्रथमच कासवांची घरटी आढळली असून तीन किनार्‍यांवर स्वतंत्रपणे कासव संरक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे (konkan sea turtle). त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कासवांची विण होणार्‍या किनार्‍यांची संख्या १६ वरून २३ झाली आहे. (konkan sea turtle)
 
 
 
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमधील काही प्रमुख किनार्‍यांवर ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची घरटी आढळतात. यंदा ऑलिव्ह रिडले कासवांनी रत्नागिरीतील काही किनार्‍यांना नव्याने जवळ करत काळबादेवी, अन्सुरे (दांडे), आंबोळगड आणि गणेशगुळे किनार्‍यांवर घरटी केली आहेत. यापूर्वी या किनार्‍यांवर कासवाची घरटी आढळत नव्हती. रत्नागिरी जिल्ह्यात ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचे १६ किनारे होते, आता त्यामध्ये नव्याने आणखी चार किनार्‍यांची भर पडली आहे. आडे, मालगुंड आणि रोहिले या किनार्‍यावरील यापूर्वी स्वतंत्रपणे कासव संरक्षणाचे काम पाहिले जात नव्हते. आडे किनार्‍यावरील घरट्यांमध्ये सापडणारी कासवांची अंडी ही आंजर्ल्यात, मालगुंडची गणपतीपुळेमध्ये आणि रोहिलेची तवसाळ किनार्‍यावर आणून त्याठिकाणी संरक्षित केली जात होती. मात्र, यंदा कांदळवन कक्ष दक्षिण कोकण विभागाकडून या किनार्‍यांवर स्वतंत्रपणे कासव संरक्षणाची मोहीम सुरू करण्यात आली असून संरक्षणासाठी स्वतंत्र ‘बीच-मॅनेजर’ची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
 
 
या ठिकाणी आढळली कासवांची घरटी
नव्या किनार्‍यांमधील काळबादेवी येथे पाच, अन्सुरे (दांडे) येथे सात, आंबोळगड येथे सहा आणि गणेशगुळे येथे चार कासवांची घरटी आजतागायत आढळून आली आहेत, तर, आडे येथे तीन, मालगुंडमध्ये २१ आणि रोहिले येथे १२ घरटी आढळून आली आहेत. यापूर्वी या तीन किनार्‍यांवर पूर्ण हंगामात तीन ते चार घरटी आढळत असल्याने त्यातील अंड्यांना जवळच्या किनार्‍यावर स्थानांतरित केले जात होते.
स्थानांतरित करण्याने जन्मदरावर परिणाम
अंडी स्थानांतरित करण्याच्या वेळेत बर्‍याच कालावधी जात असल्याने त्याच्या परिणाम पिल्लांच्या जन्मदरावर पडत होता. २०२३-२४च्या कासवविणीच्या हंगामात रत्नागिरी जिल्ह्याच्या पिल्लांचा जन्मदर हा सिंधुदुर्ग आणि रायगडपेक्षादेखील कमी होता. त्यामुळे घरट्यांची वाढलेली संख्या आणि घटणारा जन्मदर लक्षात घेऊन कांदळवन कक्ष दक्षिण कोकण विभागाने यंदापासून या तिन्ही किनार्‍यांवर स्वतंत्रपणे कासव संरक्षणाचे काम सुरू केले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121