नवी दिल्ली : (India-Italy Strategic Push) भारत दौऱ्यावर आलेले इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री अँटोनियो ताजानी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशांमधील रणनीतिक, आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य अधिक वाढवण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीत व्यापार, गुंतवणूक, संशोधन, सागरी सुरक्षा आणि नवोन्मेष क्षेत्रातील सहकार्य, तसेच संरक्षण, अवकाश आणि महत्त्वाच्या तंत्रज्ञानातील भागीदारी यावर सविस्तर चर्चा झाली. याशिवाय पश्चिम आशिया परिस्थिती आणि युक्रेन संघर्षाबाबतही नेत्यांमध्ये व्यापक विचारविनिमय झाला.
पंतप्रधान मोदींचे विधान
पंतप्रधान मोदी यांनी ताजानी यांच्यासोबतच्या भेटीबद्दल आनंद व्यक्त करत, भारत-इटली संयुक्त धोरणात्मक कृती योजना अंमलात आणण्यासाठी दोन्ही देशांनी घेतलेल्या सक्रिय पावलांची प्रशंसा केली. भारत-इटली मैत्री आणखी मजबूत होत आहे, ज्यामुळे आपल्या लोकांना आणि जागतिक समुदायाला मोठा फायदा होत आहे.
एस. जयशंकर यांची प्रतिक्रिया
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, भारत-इटली संबंध गेल्या काही वर्षांत आणखी दृढ झाले आहेत आणि ही भागीदारी लोकशाही मूल्यांवर आणि स्थिर, सुरक्षित, समृद्ध जगासाठीच्या सामायिक बांधिलकीवर आधारित आहे. भविष्यातही या सहकार्याला चालना देण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध आहेत. या बैठकीत जागतिक सुरक्षा, तंत्रज्ञान आणि राजनैतिक सहकार्य वाढवण्याचे महत्व अधोरेखित झाले.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\