Indian Citizenship : भारतीय नागरिकत्व घेण्यापूर्वी मतदार यादीत नाव कसे?

सोनिया गांधींना नोटीस जारी

    10-Dec-2025   
Total Views |
Indian Citizenship
 

मुंबई : (Indian Citizenship) काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि राज्यसभा सदस्य सोनिया गांधी यांना दिल्लीतील एका न्यायालयाने नोटीस जारी केल्याचे निदर्शनास आले आहे. न्यायालयात दाखल केलेल्या अर्जामध्ये दावा करण्यात आलाय की, त्यांचे नाव १९८० साली नवी दिल्लीच्या मतदार यादीत समाविष्ट केले गेले होते, नंतर १९८२ मध्ये वगळण्यात आले. सदर नोटीस ही सोनिया गांधी यांच्या भारतीय नागरिकत्व घेण्यापूर्वी मतदार यादीत नाव समाविष्ट होण्याच्या संदर्भात आहे.(Indian Citizenship)
 
न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार, सोनिया गांधी यांचे नाव नागरिकत्व मिळण्यापूर्वीच ३ वर्षे आधी मतदार यादीत जोडण्यात आले होते. यासंदर्भातील एक याचिका मॅजिस्ट्रेट कोर्टाने फेटाळली होती. सोनिया गांधींचे नाव प्रथमच जोडताना फर्जी दस्तऐवजांचा वापर केला गेला असावा, कारण त्या वेळी त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाशी संबंधित कोणतेही कागदपत्र नव्हते. त्यामुळे हा एक गंभीर अपराध असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी म्हटले. स्पेशल जज विशाल गोगणे यांनी या प्रकरणासंदर्भात सोनिया गांधी व दिल्ली पोलिसांकडून उत्तर मागितले आहे.(Indian Citizenship)
 
हेही वाचा : Tukaram Mundhe : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी; सभागृहात गदारोळ  
 
भाजपा माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे राष्ट्रीय प्रभारी अमित मालवीय यांच्या मते, १९८० पूर्वी पीएम निवासस्थानाच्या पत्त्यावर इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी आणि मेनका गांधी यांची नावे मतदार यादीत नोंद होती. १९८० साली १ जानेवारीची पात्रता तारीख मानून मतदार यादीत सुधारणा झाली आणि त्यात सोनिया गांधी यांचे नाव मतदान केंद्र १४५ मध्ये क्रमांक ३८८ वर समाविष्ट केले गेले. कायद्यानुसार मतदार नोंदणीसाठी भारतीय नागरिक असणे अनिवार्य असल्याने हा स्पष्ट कायदा उल्लंघन होता.(Indian Citizenship)
 
मालवीय यांनी आरोप केला की सोनिया गांधी यांचे नाव नागरिकत्वासाठी आवश्यक अटी पूर्ण न करता दोनदा मतदार यादीत नोंदवले गेले; पहिल्यांदा १९८० मध्ये, त्या वेळी त्या इटालियन नागरिक होत्या, आणि दुसऱ्यांदा १९८३ मध्ये, त्या अद्याप कायदेशीररित्या भारतीय नागरिक नव्हत्या.(Indian Citizenship)
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक