छत्रपती संभाजीनगर : (Devendra Fadnavis) कायद्याचा चुकीचा अर्थ लावून निवडणूका पुढे ढकलणे अतिशय चूकीचे असून प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या उमेदवारांवर हा अन्याय आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.
निवडणूक आयोगाने राज्यातील काही ठिकाणच्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यावर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, "निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. या निवडणूका रद्द करणे अत्यंत चुकीचे आहे. अशा प्रकारे प्रत्येकवेळी कुणीही न्यायालयात जाईल आणि निवडणूक पुढे ढकलली जाईल. आजपर्यंत असे कधीच झाले नाही. निवडणूक आयोग कुठला कायदा काढत आहे आणि कुणाचा सल्ला घेत आहेत, याची मला कल्पना नाही. परंतू, जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकीलांशीही बोललो त्यांचे हेच मत आहे की, अशा प्रकारे एखादा व्यक्ती न्यायालयात गेला म्हणून निवडणूका पुढे ढकलता येत नाही."
"कायदेशीररित्या निवडणूक पुढे ढकलणे अतिशय चुकीचे आहे. ज्या उमेदवारांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या त्यांच्यावर हा मोठा अन्याय आहे. उद्या निवडणूक असताना आज ती पुढे ढकलल्याने उमेदवारांचे श्रम, मेहनत सगळे वाया गेले. हे अतिशय चुकीचे आहे. आम्ही निवडणूक आयोगाला यासंदर्भातील एक निवेदन देऊ. नगरविकास विभागाचा यात संबंध नाही. यामध्ये फक्त निवडणूक आयोगाचा संबंध असून निवडणूक आयोग पूर्णपणे स्वायत्त आहे. निवडणूक आयोगाकडे काल अनेक निवेदने गेलीत. पण हा त्यांनी घेतलेला निर्णय असून तो मान्य करावा लागेल. हा निर्णय चूक आहे," असेही ते म्हणाले. (Devendra Fadnavis)
भाजप नंबर एकचा पक्ष असणार
"या निवडणूकीत भाजप नंबर एकचा पक्ष असेल. आमचे दोन्ही मित्रपक्ष त्याच्या खालोखाल राहतील. एकूणच या निवडणूकीत महायुतीतील तिन्ही पक्ष ७० ते ७५ टक्के जागांवर निवडून येतील," असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) व्यक्त केला.
कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
"निवडणूकीमध्ये जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. तसाच आमचादेखील तो प्रयत्न आहे. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आपल्या निवडणूकीत कार्यकर्ते इतके श्रम आणि धावपळ करतात. त्यामुळे त्यांच्या निवडणूकीत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचावे अशी त्यांचीही अपेक्षा असते आणि आम्ही तो प्रयत्न करत आहोत. पूर्ण प्रचारादरम्यान मी मित्रांवर सोडाच पण विरोधकांवरही टीका केली नाही. मी कोणत्याही पक्षाच्या किंवा नेत्याच्या विरोधात बोललो नाही. एक सकारात्मक अजेंडा घेऊन आपण जात असून सकारात्मक मत मागत आहोत. त्यामुळे मी कुणाच्याही विरोधात बोलण्याचे कारण नाही," असेही ते म्हणाले. (Devendra Fadnavis)
शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांच्या सांगोल्यातील कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने छापा टाकला. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मला याबद्दल कल्पना नाही. परंतू, कुणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे, यावरून धाड टाकण्याचे ठरत नाही. एखादी तक्रार आल्यास तिथे चौकशी केली जाते. आमच्या कार्यकर्त्यांचीही काही तक्रार आली तर तिथे चौकशी करतात. अनेकवेळा माझीसुद्धा गाडी तपासली आहे. त्यामुळे यामध्ये सत्ता किंवा विरोधक अशा गोष्टी नसतात." (Devendra Fadnavis)
कुणीही आमचा शत्रू नाही
"संजय राऊत बरे झालेत ही आनंदाची गोष्ट आहे. ते त्यांचे काम करतात, आम्ही आमचे काम करतो. पण कुणीही आमचा शत्रू नाही. ते आमचे राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे कुठलाही विरोधक आजारी पडला तर त्याची तब्येत ठीक व्हावी हीच आपली अपेक्षा असते. संजय राऊत रोज काय काय बोलतात याला मी कालही उत्तर दिले नाही आजही दिले नाही. कारण मी त्यांची वक्तव्ये उत्तर देण्याच्या लायकीचे समजत नाही," असेही मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले.
राणे विरुद्ध राणे योग्य नाही
"जो चांगला वागेल त्याच्या पाठीशी मी आहे. कोणी चुकला तर मी त्याला सांगेल. माझ्या पक्षाचा व्यक्ती असला तरी मी चुकीच्या मागे राहत नाही. जे योग्य असेल त्याच्यामागे मी असतो. परंतू, सध्या जी परिस्थिती आहे ते योग्य नाही. राणे विरुद्ध राणे असे होणे योग्य नाही. या निवडणूकीनंतर यासंदर्भात आम्ही सर्वांनी आत्मचिंतन केले पाहिजे," असेही ते म्हणाले. (Devendra Fadnavis)
निवडणूकीला पाठ दाखवणे योग्य नाही
"या कार्यकर्त्यांच्या निवडणूका आहेत. जे कार्यकर्ते आपल्यासाठी राबतात त्यांच्या निवडणूकांमध्ये आपण फिरायचे नाही, त्यांना मदत करायची नाही, हे योग्य नाही. पण या निवडणूकीत विरोधकांचा पराभव होणार असल्याची कल्पना त्यांना आहे. त्यामुळे त्यांना पराभवाचा शिक्का माथी लावून घ्यायचा नाही. आपण कधी हरतो, कधी जिंकतो. पण निवडणूकीच्या मैदानातून निघून जाणे किंवा निवडणूकीला पाठ दाखवणे लोकशाहीत योग्य नाही. आमची वेळ असताना आमच्या नेत्यांनी आम्हाला साथ दिली नाही ही गोष्ट कार्यकर्ते लक्षात ठेवतील," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विरोधकांबद्दल बोलताना म्हणाले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....