मुंबई : (Shashi Tharoor on Bihar Assembly Election Result 2025) बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने दोनशेचा आकडा पार केला आहे. एनडीए आणि महागठबंधन यांच्यामध्ये बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले. आज (दि. १४) सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरु आहे. अंतिम फेरीतील मतमोजणी झाल्यानंतर अंतिम निकाल हाती येईल. मात्र, निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. दरम्यान, काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
पराभवाच्या कारणांचा आढावा घेतला पाहिजे
काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी निकालाविषयी बोलताना म्हटलं की, "सध्याचा प्रश्न नेतृत्वाचा आहे. ते (एनडीए) बऱ्यापैकी मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत. पण निकाल जाहीर करण्यासाठी आपण निवडणूक आयोगाची चर्चा आणि निर्णयाची वाट पाहूया. मला खात्री आहे की पक्षाची (काँग्रेस) ही जबाबदारी आहे की त्यांनी या कारणांचा सखोल अभ्यास करावा. पण लक्षात ठेवा, आम्ही युतीमध्ये वरिष्ठ भागीदार नव्हतो आणि राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) सर्वाधिक जागा लढवल्या होत्या. त्यामुळे त्यांनीदेखील त्यांच्या स्वतःच्या कामगिरीचे काळजीपूर्वक परीक्षण करणे आवश्यक आहे. पण मी एवढे नक्कीच सांगेन की, अशा विषयावर आपल्या एकूण कामगिरीकडे पाहणे खूप महत्त्वाचे आहे," असे थरूर म्हणाले.
विजय आणि पराभव अनेक घटकांवर अवलंबून असतो
थरुर पुढे म्हणाले, "लोकांचा कल, संघटनात्मक शक्ती आणि कमकुवतपणा, असे अनेक मुद्दे पाहावे लागतात. काय चुकले आणि काय बरोबर झाले हे पाहण्यासाठी खूप गोष्टी आहेत. परंतु कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपण अंतिम निकालांची वाट पाहूया."
महिलांनी एनडीएला पाठिंबा का दिला?
निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर असे म्हटले जात आहे की, एनडीएच्या विजयात महिलांसाठीच्या सरकारी योजनांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावर शशी थरूर म्हणाले की, "आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बिहारमधील महिला मतदारांना रोख स्वरूपातील लाभाच्या योजना देण्यात आल्या होत्या. आपल्याला हे चुकीचे वाटत असले तरी, दुर्दैवाने आपल्या कायद्यानुसार ते वैध आहे. राज्यांच्या सरकारांना समाजातील विशिष्ट वर्गाला असे लाभदेताना पाहण्याची ही काही पहिली वेळ नाही. ही गोष्ट असामान्य नाही. मला वाटत नाही की ही एक योग्य पद्धत आहे, परंतु महाराष्ट्रात तसेच यापूर्वी इतर राज्यांमध्येही आपण असेच काहीसे पाहिले आहे. असो, आपण निकालांचे सखोल विश्लेषण करूया. मला वाटते की जे लोक थेट प्रचार मोहिमेत सहभागी होते, ते याचा अधिक सखोल अभ्यास करतील," असे ते म्हणाले.