मुंबई : आयटीआयमध्ये सुरु झालेल्या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांमुळे तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच यावेळी त्यांनी राज्याच्या कौशल्य विकास विभागाचे कौतुक केले.
बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई मेट्रो तीनच्या अंतिम टप्प्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्या हस्ते राज्यातील ४१९ औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयात अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचाही शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री किंजरापू नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमात काळाला अनुरूप अत्याधुनिक रोबोटिक, ग्रीन हायड्रोजन अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहन, सोलर ऊर्जा, सायबर सुरक्षा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सोशल मीडिया प्रभावक (इन्फ्लुएंसर) इत्यादी अत्याधुनिक विषयांचा समावेश करण्यात आला आहे. हे अभ्यासक्रम प्रशिक्षणार्थींना नव्या प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणार आहेत. त्याचबरोबर देशातल्या आयटीआयला अत्याधुनिक तंत्रज्ञानासह जागतिक दर्जाच्या रोजगाराभिमुख संस्था बनवण्यासाठी केंद्र सरकारने ६० हजार कोटींची नुकतीच पीएम सेतू योजना सुरु केली आहे, त्याचाही देशातल्या युवकांना लाभ होणार आहे."
अत्याधुनिक अभ्यासक्रमातून कौशल्ययुक्त महाराष्ट्र घडवणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासाला नवी दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वात नव्या भारताची निर्मिती होत आहे. या काळात अत्याधुनिक अभ्यासक्रमांच्या माध्यमाने आम्ही कौशल्ययुक्त महाराष्ट्र घडवू," अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "एकीकडे प्रधानमंत्री मोदीजी यांच्या शुभहस्ते नवी मुंबईत ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ या महत्वकांक्षी उपक्रमाचे उदघाटन होत असतानाच राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शासकीय तांत्रिक विद्यालये मिळून ५६० संस्थांमध्ये एकाच वेळी विश्वकर्मांच्या प्रमुख उपस्थितीत या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुदृढ आणि सौहार्दपूर्ण समाज निर्माण करण्यासाठी कामगारांना सन्मानाचे स्थान मिळायला हवे हा प्रधानमंत्री मोदीजींचा विचार आम्ही या निमित्ताने पुढे घेऊन जात आहोत," असे त्यांनी सांगितले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....