डिजिटल युगात सायबर गुन्हे टाळणे सर्वात मोठे आव्हान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    04-Oct-2025   
Total Views |

मुंबई : आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हे टाळणे हेच सर्वात मोठे आव्हान असून गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगाराला शिक्षा होण्याबरोबरच आर्थिक तोटा टाळणे आवश्यक आहे. सायबर फसवणूक झाल्याचे समजल्यास तातडीने तक्रार द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, ३ ऑक्टोबर रोजी केले.

महाराष्ट्र पोलीस मुख्यालय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘सायबर जनजागृती’ माह ऑक्टोबर २०२५ कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री राणी मुखर्जी, व्हीजेटीआयचे डॉ. फारूक काझी, ‘आयआयटी’ मुंबईचे प्रा. मंजेश हनवाल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "रस्ता अपघातामध्ये ज्या पद्धतीने ' गोल्डन अवर'मध्ये उपचार मिळाल्यास अपघातग्रस्तांचे प्राण वाचू शकतात. त्याच पद्धतीने सायबर फसवणुकीमध्येही 'गोल्डन अवर' महत्वाचा आहे. जेवढी विनाविलंब तक्रार द्याल, तेवढी फसवणूक झालेली रक्कम वाचविणे आणि परत मिळविणे सोयीचे होते. त्यामुळे सायबर फसवणूक झाल्याचे समजल्यास तातडीने विनाविलंब १९३० किंवा १९४५ या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार द्यावी. आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हे टाळणे हेच सर्वात मोठे आव्हान आहे. गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगाराला शिक्षा होण्याबरोबरच आर्थिक तोटा टाळणे आवश्यक आहे."

जनजागृती हाच प्रभावी उपाय

"सायबर फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती हा सर्वात प्रभावी उपाय आहे. कृत्रिम बुध्दिमत्तेच्या वापरामुळे फिशिंग, ओटीपी फसवणूक, डीपफेक, आवाज आणि चेहरा क्लोनिंग अशा नवीन तंत्रांचा गैरवापर करून सामान्य लोकांना फसवले जात आहे. सोशल मीडिया, ऑनलाईन व्यवहार, पेमेंट्स यामध्ये आपण माहिती देतो. कुकीज स्वीकारल्यानंतर वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ शकतो. यावरून घोटाळे, खंडणी, सायबर बुलिंग यासारखे प्रकार घडतात," असे ते म्हणाले.

वेळेवर तक्रार होणे महत्वाचे

"राज्यात जागतिक स्तराची सायबर सिक्युरिटी लॅब, प्रतिसाद केंद्रे आणि रेग्युलेटरी यंत्रणा उभारण्यात आल्या आहेत. यामुळे फसवणुकीनंतर तत्काळ कारवाई करून नुकसान कमी करता येते. मात्र, यासाठी वेळेवर तक्रार होणे महत्वाचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानच धोका असून त्यावर तंत्रज्ञान हाच उपाय आहे. डीपफेकसारख्या आव्हानांवर आपली क्षमता वाढवणे गरजेचे आहे. कोणताही डिजिटल गुन्हा त्याचा डिजिटल फिंगरप्रिंट मागे ठेवतो. त्यामुळे क्षमता आणि जनजागृती दोन्ही समान महत्त्वाचे आहेत. युवकांपर्यंत सायबर सुरक्षिततेबाबत माहिती पोहोचवणे आवश्यक असून या कार्यात कम्युनिकेटर्सची महत्वाची भूमिका आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

"अलीकडच्या काळात रस्त्यावरच्या गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्हे वाढत आहेत. मोठ्या प्रमाणात लोकांचे पैसे जात आहेत. ऑनलाईन फसवणूक, खंडणी होत आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्राने देशातील सर्वात चांगले सायबर गुन्हे सेंटर उघडले आहे. हे गुन्हे घडू नये यासाठी जनजागृती करणे महत्वाचे असून केंद्र सरकारच्या वतीने हा जनजागृती महिना सुरु झाला असून आपण तो महाराष्ट्रात सुरु केला आहे. याद्वारे मोठ्या प्रमाणात संवाद करून जनजागृती करायची आहे. विशेषत: विद्यार्थ्यांमध्येही मोठी जागरूकता मोहिम सुरु करायची असून ती आम्ही आज सुरु केली आहे. शाळांमध्ये एक व्यवस्था उभी करावी लागेल. तिसऱ्या वर्गापासून पुढे सर्व मुलांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे सायबर गुन्हे आणि त्याबाबतची जागरुकता शिकवणे गरजेचे आहे."
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....