मुंबई : उबाठा गटासाठी ९ हा आकडा लाभदायक असून त्यांच्या दसरा मेळाव्याचे नियोजनही ६३ कोटींच्या घरात असणार आहे, असा दावा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवार, १ ऑक्टोबर रोजी केला.
केशव उपाध्ये म्हणाले की, "नऊ हा ‘आकडा’ लाभदायक असल्याचे कुणीतरी सांगितल्यापासून उबाठाचे सगळे व्यवहार या आकड्यांवर अवलंबून असतात. निवडणुकीतील उमेदवारांच्या संख्येची बेरीज नऊ हवी, टक्केवारी नऊपेक्षा कमी नसावी, इतकेच काय, दोघा भावांमध्ये असलेल्या ३६ च्या आकड्याची बेरीजही नऊ असावी याची नेहमीच काळजी घेणाऱ्या या गटाचा दसरा मेळाव्याचे नियोजनही ६३ कोटींच्या घरात असणार आहे. गटाच्या गोटातील सूत्रांनी दिलेली ही अत्यंत खात्रीलायक माहिती असून मेळाव्यासाठी तब्बल ६३ कोटीचे नियोजन झाल्याचे या गटातील नेत्यानेच हर्षोल्हासित होत सांगितले."
"सभा ठिकाण, स्टेज सजावट, जाहिराती, सोशल मीडिया, त्याशिवाय लोकांना आणायला गाड्या, शिवाय त्यांच्या वडापाव, चहापाण्याची व्यवस्था, असे सगळे मिळून हे ६३ कोटी लागणार आहेत म्हणे. या ६३ कोटींमध्ये अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या मराठवाड्यात किती गावातील शेतकऱ्यांना मदत झाली असती? किती घरे वसवली गेली असती?," असा सवालही त्यांनी केला.
नाकी नऊ आले म्हणतात ते हेच
"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना लोक स्वतःहून उत्साहात यायचे. तेव्हा सेना प्रमुखांच्या विचारांचे सोने असाये. आता तशी परिस्थिती नाही. मागचे काही मेळावे आठवल्यास मिंधे, खंजीर, माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरले ही रडगाणी ऐकायला मिळतात. एकट्या गटातून गर्दीही गोळा होत नाही म्हणून ३६ चा आकडा मोडून ६३ ची गोळाबेरीज करण्याचा हा आटापीटा आहे. नाकी नऊ आले म्हणतात ते हेच. रडगाण्याचे तेच बेसूर सूर आळवायला खरंच ६३ कोटीचा मेळावा घ्यायची गरज आहे का? हवे तर उद्धव ठाकरेंच्या नावाने मराठवाड्यात मदत करा पण हे ६३ कोटी महाराष्ट्राच्याच उभारणीत लावा," असेही केशव उपाध्ये म्हणाले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....