मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sanskruti Samvardhan Pratishthan) संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने रामायण, महाभारतावर आधारित परीक्षा आयोजित केली होती. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील दोन हजाराहून अधिक शाळांमधील तब्बल दोन लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेतला होता. गुरुवार, दि. १६ जानेवारी रोजी, एकाच दिवशी एकाच वेळी संपन्न झालेल्या या परीक्षांचे नियोजन आणि कार्यवाही करण्यासाठी तीन हजार स्वयंसेवक यात स्वयं स्फूर्तीने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या परीक्षेत मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग असून यातील अनेक विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी देखील ठरले आहेत.
हे वाचलंत का? : भारताची अंतर्गत सुरक्षा आणि केंद्रीय गृहमंत्रालय : 2024चे सिंहावलोकन
कथा पुस्तकांच्या आधारे तसेच दृकश्राव्य पद्धतीने सहभागी शाळांमधील विद्यार्थ्यांना दर आठवड्याला कथाकथन केले जाते. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याने जाहीर केलेल्या"आनंदी शनिवार"या संकल्पने अंतर्गत रामायण, महाभारत आणि संतांच्या कथा विद्यार्थ्यांना सांगितल्या जातात. सदर उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आधार म्हणून ६० गुणांच्या वस्तुनिष्ठ परीक्षेचे आयोजन एकाच वेळी सर्व सहभागी शाळांमध्ये करण्यात येते. परीक्षेतील गुणांच्या आधारावर प्रत्येक इयत्तेच्या प्रथम क्रमांकाला सुवर्णपदक देऊन गौरविण्यात येते. शालेय विद्यार्थ्यांना रामायण-महाभारताची ओळख व्हावी, भारतीय जीवन मूल्यांचे संचित आजच्या पिढीसमोर जावे या हेतूने गेली २१ वर्ष हा संस्कार यज्ञ सुरू आहे.
मुंबई कोकणपट्ट्यातील ११०७ शाळा, पश्चिम महाराष्ट्रातील १५७ शाळा, विदर्भातील ३७७ शाळा आणि देवगिरी-छत्रपती संभाजीनगर पट्ट्यातील ४३४ शाळांचे विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते. सदर उपक्रम मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती अशा चार भाषांमध्ये तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्रात सुरू झालेला उपक्रम देशातील २१ राज्यांमध्ये सुरू आहे. यात कथा पुस्तकांचे त्या-त्या राज्यातील भाषांमध्ये भाषांतर करून विद्यार्थ्यांना कथा सांगण्याचा प्रयत्न होतो, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक विश्वस्त मोहन सालेकर यांनी दिली.