जागतिक व्यासपीठांवर पर्यावरण रक्षणासाठी विविध करारांवर स्वाक्षर्या करून जबाबदारीचे प्रदर्शन करणार्या अमेरिकेने, स्वतःच्या औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रणावर फारसे लक्ष दिलेले नाही. कारण, जागतिक पातळीवर इतर देशांना पर्यावरण रक्षणाचा उपदेश करणारी ही महासत्ता स्वतः पर्यावरण रक्षणामध्ये सातत्याने अपयशी ठरली आहे.
अमेरिकेच्या पर्यावरण धोरणांबाबत कायमच चर्चा होत असते. परंतु, प्रत्यक्ष कृतीत मात्र हा देश आपल्याच हरितगृह वायू उत्सर्जनातील अपयश लपवू शकलेला नाही. आंतरराष्ट्रीय मंचांवर वातावरणातील बदलाविरोधात लढण्याचे आश्वासन देणार्या अमेरिकेची प्रत्यक्ष कृती मात्र विरोधाभासी. जागतिक व्यासपीठांवर पर्यावरण रक्षणासाठी विविध करारांवर स्वाक्षर्या करून जबाबदारीचे प्रदर्शन करणार्या अमेरिकेने, स्वतःच्या औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रणावर फारसे लक्ष दिलेले नाही. कारण, जागतिक पातळीवर इतर देशांना पर्यावरण रक्षणाचा उपदेश करणारी ही महासत्ता स्वतः पर्यावरण रक्षणामध्ये सातत्याने अपयशी ठरली आहे.
दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये सध्या सुरू असलेल्या वणव्याने लाखो लोकांचे जीवन धोक्यात आले. ‘सॅन्टा एना’ नामक वार्यांच्या प्रचंड वेगामुळे आणि कोरड्या हवामानामुळे ही आग झपाट्याने पसरत असून, तिने दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये मोठ्या प्रमाणावर विनाश घडवला. या आगीमागील कारणे शोधताना, अनेक पर्यावरणीय आणि मानवनिर्मित घटकांची स्पष्ट जाणीव होते. वाढते तापमान आणि कमी झालेली आर्द्रता ही या समस्येची मुख्य कारणे आहेत. पर्यावरण बदलाच्या गंभीर परिणामांमुळे या भागातील हवामान अधिक कोरडे झाले आहे. याचा परिणाम म्हणजे, जंगलातील वृक्ष शुष्क झाल्याने आगीसाठी अधिक सोपे भक्ष ठरत आहेत. ‘सॅन्टा एना’ हे वारे कोरडे आणि उष्ण असतात. त्याच्या या गुणधर्मामुळे आगीच्या प्रसाराला ते पोषक ठरतात.
याशिवाय, या आग पसरण्यात काही मानवी दोषदेखील मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत. वीजपुरवठा यंत्रणेतील त्रुटी, वीजवाहिन्यांच्या आसपास असलेल्या कोरड्या झाडांच्या फांद्या आणि जंगल क्षेत्रात न झालेला विकास या सगळ्याचा आग पसरवण्यात मोठा वाटा आहे. परिणामतः, ही आगीमुळे पर्यावरणीय व्यवस्थापनातील त्रुटीही ठळकपणे समोर आल्या आहेत.
या पसरलेल्या वणव्यामुळे होणारे नुकसान भयानक असेच. आतापर्यंत किमान 25 जणांचा यामध्ये मृत्यू झाला असून, हजारो घरे भस्मसात झाली आहेत. या वणव्यामुळे सुमारे 88 हजार लोकांना आपले घर सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले असून, वीजपुरवठा खंडित झाल्याने दक्षिण कॅलिफोर्नियाच्या आसपासच्या प्रदेशातील 85 हजार लोकांना अंधारात दिवस काढावे लागत आहेत. यामुळे केवळ आर्थिकच नाही, तर मानसिक त्रासही नागरिकांना सहन करावा लागत आहे. अनेकांचे जीवनच उद्ध्वस्त झाले असून, जंगलातील जैवविविधतेलाही मोठा धोका निर्माण झाला आहे.
या संकटाचा सामना करण्यासाठी व्यापक उपाययोजना करणे गरजेचे आहे. सर्वात आधी वीजपुरवठा यंत्रणेचेच आधुनिकीकरण करणे महत्त्वाचे झाले असून, झाकलेले कंडक्टर, फास्ट-एक्टिंग फ्यूज आणि आधुनिक सुरक्षा प्रणालींचा वापर करून, आग लागण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवता येईल. याशिवाय, वीजवाहिन्यांच्या आजूबाजूची झाडेदेखील वेळोवेळी छाटणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये, वातावरणीय बदलांचा सामना करणे अत्यावश्यक आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे, पर्यावरणस्नेही धोरणे आखणे आणि त्याची चोख अंमलबजावणी करणे, पर्यावरणीय संवर्धनासाठी जागतिक स्तरावर सहकार्य करणे महत्त्वाचे. याशिवाय, जंगलातील परिसंस्थेचे संरक्षण करण्यासाठी आणि नैसर्गिक स्रोतांचा जबाबदारीने वापर करण्यासाठीही अमेरिकेने शहाणपणा दाखवणे गरजेचे झाले आहे.
दक्षिण कॅलिफोर्नियातील ही आग केवळ अमेरिकेपुरती मर्यादित समस्या नाही, तर ती संपूर्ण मानवजातीसाठीच एक गर्भित इशारा आहे. जागतिक हवामान बदलाच्या समस्येवर जर वेळेवर योग्य उपाययोजना केल्या गेल्या नाहीत, तर भविष्यात अशा आपत्तींचा सामना अधिक तीव्रतेने करावा लागेल. म्हणूनच, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरणीय संवर्धन आणि पर्यावरणात होणारा मानवी हस्तक्षेप कमी करणे, हे सगळे घटक एकत्रितपणे हाताळले गेले पाहिजे. त्यासाठी प्रगत देशांनी इतर प्रगतशील देशांना उपदेश देण्याचे काम न करता, स्वत:देखील आदर्श प्रस्थापित केले पाहिजेत. तसेच, इतर लहान देशांना पर्यावरणस्नेही प्रकल्पांच्या विकासासाठी सहकार्य केले पाहिजे. सामूहिक प्रयत्नांद्वारेच अशा संकटांवर मात करून, पृथ्वीवरील पर्यावरणीय संतुलन राखता येईल.