"उद्योजकांना धमकी येत असेल तर..." उदय सामंत यांचा समाजकंटकांना इशारा
12-Jan-2025
Total Views | 51
मुंबई : महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला काही समाजकंटकांकडून खंडणी मागण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अशातच आता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेतून आवाहन केले आहे की जर का उद्योजकांना खंडणीसाठी कुणा माफियाने किंवा गुंडाने धमकी दिल्यास त्यांनी निर्भयपणे पुढे येऊन त्यावर बोलावे, सरकार त्या उद्योजकांना संरक्षण देईल. दहशत माजवणाऱ्या अशा प्रवृत्ती ठेचून काढल्या पाहिजे असे मत त्यांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
उद्योजक जर पुढे आले नाहीत तर सुमुटो पद्धतीने खंडणी मागणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. माथाडी कामगारांना न्याय देण्यासाठी माथाडी चळवळ उभी राहिली. परंतु माथाडी चळवळीच्या पाठीमागून जे खंडणी मागण्याचे प्रकार सुरू आहेत, ती निपटून काढणे गरजेचे आहे. परदेशी गुंतवणूक करण्यासाठी चांगले वातावरण तयार करण्यात येणार आहे. त्याच बरोबर परदेशी उद्योजकांनी पुण्यात उद्योग उभारावेत यासाठी एक नवीन पॉलिसी तयार करण्यात येणार असल्याचे देखील सामंत यांनी स्पष्ट केले आहे.