राज्यातील पहिल्या सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्पाचे उद्घाटन
19-Sep-2024
Total Views |
मुंबई, दि. १८ : (RRP Electronics Limited) ‘आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ या अग्रगण्य सेमीकंडक्टर कंपनीला २४ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा मेगा प्रकल्प उभारण्यास राज्य सरकारने नुकतीच मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली होती. महाराष्ट्रात सेमीकंडक्टर प्लांटची स्थापना करणारी ‘आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स’ ही पहिली कंपनी आहे. महापे, नवी मुंबई येथील प्रकल्पाचे बुधवार, दि. १८ सप्टेंबर रोजी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, ‘पद्मविभूषण’ डॉ. अनिल काकोडकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर, ‘आरआरपी ग्रुप’चे राजेंद्र चोडणकर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
गुंतवणूक राज्याबाहेर गेल्याबद्दल ओरड करण्यात आली. मात्र, कोणताही उद्योग एक ते दोन दिवसांत सुरू करण्याचा निर्णय घेत नाही. उद्योगपूरक वातावरण, कुशल मनुष्यबळ आणि सरकारकडून मिळणारे भक्कम सहकार्य यामुळे अनेक उद्योगांनी राज्याला पसंती दिली आहे. ग्रीन हायड्रोजन, सेमी कंडक्टर आणि इलेक्ट्रिक व्हेईकल या क्षेत्रात येणार्या कंपन्यांमुळे राज्यात मोठी गुंतवणूक होणार आहे. अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई-पुणे मिसिंग लिंक तसेच मेट्रोचे जाळे यामुळे महाराष्ट्र राज्य आजही उद्योजकांसाठी पहिली पसंती असल्याचे मत मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या उद्योगक्षेत्राला मोठी गती मिळेल, अशी खात्री मला आहे. इतर राज्ये सेमीकंडक्टर क्षेत्रात गुंतवणुकीची केवळ घोषणा करत असताना, हा प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित करणारे, सेमीकंडक्टर उत्पादनासाठी संपूर्ण परिसंस्था स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे, याचा मला फार आनंद आहे. या प्रकल्पाच्या रूपाने महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय आज सुरू झालेला आहे. राज्यातील औद्योगिकक्षेत्राला चालना देण्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पामुळे डिजिटल क्रांतीला गती मिळणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे तर, चार हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती त्यातून होईल, अशी खात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
ही तर एक सुरुवात : फडणवीस
एका मराठी माणसाने भारतात पहिल्यांदा ही इकोसिस्टीम तयार केली. आपण आयटी क्षेत्रात पुढे गेलो, डिझाईन क्षेत्रात पुढे गेलो मात्र हार्डवेअरच्या क्षेत्रात आपल्याला कमतरता भासत होती. भारतासारख्या देशाला कोविडकाळात लक्षात आले की, आपल्याला विकसित राष्ट्र म्हणून प्रस्थापित व्हायचे असेल, तर ही इंडस्ट्री आपल्याकडे स्थापन करावीच लागेल. म्हणून देशाच्या पंतप्रधानांनी एक मिशन हाती घेतले. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, ज्याने सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी स्वतःची पॉलिसी तयार केली. आपले स्वतःचे इंटेन्सिव्ह पॅकेज तयार केले. यासह स्वतःची सपोर्टिव्ह इकोसिस्टीम तयार केली. यामध्ये आरआरपी इलेकट्रोनिक सगळ्यात पुढे आहे. ही एक सुरुवात आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासह फडणवीस यांनी राज्यातील सेमीकंडक्टर क्षेत्रात राज्यात करण्यात आलेल्या गुंतवणुकीचा आढावा घेतला.