मुंबई : सुषमा अंधारेंना शिवसेना किती माहिती आहे? कोण आहेत या बाई? असा सवाल शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांनी केला आहे. यामिनी जाधव यांनी त्यांच्या भायखळा मतदारसंघात मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केले. यावरून उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी त्यांच्यावर टीका केली होती. यावर आता त्यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला.
यामिनी जाधव म्हणाल्या की, "माझ्या विधानसभा मतदारसंघात सर्वच धर्मांची लोकं राहतात. त्यामुळे लोकप्रतिनिधीने त्याच्या विभागातील लोकांना काय हवं, याचा विचार करणं गरजेचं असतं. बाहेर वावरताना स्वत:चा धर्म पुढे न करता लोकांना काय हवं हे बघणं गरजेचं असतं. दिवाळीला आपण आपल्या कार्यकर्त्यांना काहीतरी भेट देतो. परंतू, मुस्लिम भगिनींना काहीच देत नाहीत. त्यामुळे वर्षभरापूर्वी ही कल्पना आमच्या डोक्यात आली. त्यानंतर आम्ही बुरखा वाटप केलं. बुरखा हा मुस्लिम महिलांचा सन्मान आहे. गेली अनेक वर्षे आम्ही या विधानसभेत मुस्लिम धर्माची कामं करतो," असे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, "सुषमा अंधारेंना शिवसेना किती माहिती आहे? कोण आहेत या बाई? त्यांना शिवसेनेत किती वर्षे झालीत. ज्या बाईने बाळासाहेब ठाकरेंवर अर्वाच्च भाषेत टीका केली, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्या जर आम्हाला गद्दार म्हणत असतील तर त्यासुद्धा कुठलातरी पक्ष बदलून आल्या आहेत. त्या मुळच्या शिवसैनिक आहेत का? ज्या व्यक्तीने तुमच्या दैवताला अर्वाच्च भाषेत शिव्या दिल्या त्या तुमचं नेतृत्व करतात. हे कितपत पटतंय?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.