"जरांगे पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींना..."; प्रसाद लाड यांचा सवाल
12-Sep-2024
Total Views |
मुंबई : मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबद्दल राहुल गांधींना प्रश्न विचारणार का? असा सवाल भाजप नेते प्रसाद लाड यांनी विचारला आहे. राहूल गांधींनी अमेरिकेत आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य केले होते. यावरून प्रसाद लाड यांनी जरांगेंना प्रश्न विचारला.
प्रसाद लाड म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीत नरेटिव्ह सेट करणाऱ्या काँग्रेसची खरी आणि संविधान विरोधी भूमिका राहुल गांधींच्या तोंडून आता समोर आली आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबद्दल राहुल गांधींना प्रश्न विचारणार का? महाविकास आघाडीचा चेहरा पुरता फाडणार आहेत का? की, पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा बुरखा घालून राहूल गांधींची साथ देणार आहेत?" असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "ज्या आरक्षणासाठी भाजप आणि महायूतीने संघर्ष केला तेच आरक्षण जर राहूल गांधी संपवणार असतील तर मनोज जरांगे राहूल गांधींच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार आहेत का? देवेंद्र फडणवीसांना शिव्याशाप देणारे जरांगे आता राहूल गांधीसुद्धा फडणवीसांचा माणूस आहे असं म्हणतील का? हिंमत असेल तर पुढच्या दोन तासांत पत्रकार परिषद घेऊन राहूल गांधींचा बुरखा फाडा. तरच तुम्ही खरे मराठा आरक्षणाचे आंदोलक आहात असं आम्ही समजू. नाहीतर तुमचं भेकडी प्रेम आणि मराठ्यांना फसवण्याचं उद्दिष्ट आज जनतेसमोर येईल आणि तुमचा बुरखा फाटेल," असे आव्हानही प्रसाद लाड यांनी जरांगेंना दिले आहे.