मुंबई : आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि सरन्यायाधिश त्याला उपस्थित रहायचे. मग आता पंतप्रधान नरेंद्र मोदी गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला गेले तर इतका गहजब का? असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूद यांच्या निवासस्थानी गणपतीची पूजा केली. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. यावर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गणेशोत्सवाची देशभरात सर्वत्र धूम आहे. आस्थेने गणरायाचे पूजन केले जात आहे. काल तर गौरी-गणपतीतील महालक्ष्मीपूजन सुद्धा होते. देशाचे सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांच्याकडे काल पंतप्रधानांनी गणरायाची आरती केली आणि महालक्ष्मी पूजनसुद्धा केले. सरन्यायाधीश महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीत खास महाराष्ट्रीयन व्यक्तीकडूनच ते दरवर्षी गणरायाची मूर्ती पूजेसाठी आणतात."
हे वाचलंत का? - लालबागचा राजा मंडळ परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट!
"पण अचानक इकोसिस्टीम अशी कार्यान्वित झाली की, जणू आभाळ कोसळले. फरक फक्त इतकाच आहे की, आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. पण, गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले तर इतका गहजब का? हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी? हा प्रश्न गहन आहे. हा महाराष्ट्रीयन सणांचा, महाराष्ट्र धर्माचा, मराठी संस्कृतीचा, गौरी-गणपतींच्या भक्ती आणि श्रद्धेचा अपमान नाही का?" असा सवाल त्यांनी केला आहे.