"महाविकास आघाडीच्या बैठका म्हणजे निव्वळ..." केशव उपाध्येंचा घणाघात
09-Aug-2024
Total Views |
मुंबई : महाविकास आघाडीच्या बैठका म्हणजे निव्वळ कोरडे चिपाड आहेत. त्यात ना चव आहे, ना रस, ना गोडवा आहे, असा घणाघात भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला. तसेच कॉंग्रेसची हुजरेगिरी करूनही उद्धव ठाकरेंना काहीच मिळाले नाही, असेही ते म्हणाले.
केशव उपाध्ये म्हणाले की, "मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी ३ दिवस दिल्लीत मुक्काम करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना हुजरेगीरी करूनही हाती कोरडे चिपाडच लागले. तीन दिवस बैठका, भेटी घेऊनही रिकामे हात हलवत परत यावे लागले आहे. उबाठाच्या दिल्ली वारीतून महाराष्ट्राच्या वाट्याला तर सोडाच पण उबाठाच्या हातीही धुपाटणेच आले," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "महाविकास आघाडीच्या बैठका म्हणजे निव्वळ कोरडे चिपाड आहेत, ना चव.. ना रस ...ना गोडवा आहे. मुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षेपायी उद्धव ठाकरेंनी दिल्लीचे उंबरे झिजवले. पण काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा निवडणुकीनंतर होणार असून ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री असे सांगून ठाकरेंची निराशा केली. जागावाटपातही काँग्रेस मोठा भाऊ असणार, असा स्पष्ट संदेश दिल्लीवारीतून उद्धव ठाकरेंना काँग्रेसने दिल्याने उबाठा सेनेने स्वाभिमान गमावला. विधानसभेसाठी जास्त जागा लढविता याव्यात यासाठी उबाठांनी दिल्लीवारी केली मात्र त्याही बाबतीत निराशाच पदरी पडणार आहे."
" ठाकरेंनी ज्या अमित शहांची तुलना अब्दालीशी केली, तेच अमित शहा भाजपाचे अध्यक्ष असतानाही मातोश्रीवर चर्चेसाठी आले होते. २०१९ मध्ये भाजपाने तुमचा सन्मान राखत तुम्हाला १२५ जागा दिल्या होत्या. आता तुम्हाला १०० जागा मिळवण्यासाठी काँग्रेसच्या दिल्ली तख्तापुढे झुकावे लागते आहे. जागावाटपात १०० जागाही तुम्हाला मिळणार नाहीत. मग तुमच्या दिल्ली दौ-यातून नेमके पदरी तरी काय पडले," असा खोचक सवाल केशव उपाध्येंनी केला.
तसेच "महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकार प्रामाणिक प्रयत्न करत असताना उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन मविआच्या घटक पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून आरक्षणाबाबत काही ठोस भूमिका घेतील अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. पण तीदेखील धुळीस मिळाली. ठाकरे हे केवळ स्वत:च्या राजकीय हव्यासापोटी दिल्लीला गेले होते. त्यांना महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या हिताशी काहीही देणेघेणे नाही," अशी टीकाही त्यांनी यांनी केली.