'हर घर तिरंगा अभियान' आता लोकचळवळ बनलीये : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
घरोघरी तिरंगा (हर घर तिरंगा) अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ
09-Aug-2024
Total Views |
मुंबई : 'हर घर तिरंगा अभियान' आता लोकचळवळ बनली आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे. शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ऑगस्ट क्रांती मैदानात घरोघरी तिरंगा (हर घर तिरंगा) अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले. घरोघरी तिरंगा अभियान आपल्याला त्यांच्या त्याग आणि बलिदानाची सतत जाणीव करून देईल. त्याचबरोबर राष्ट्रप्रेमाची नवी उभारी देईल. कारण आता हे अभियान लोकचळवळ बनले आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "यावर्षीही राज्यातील अडीच कोटी घरावर तिरंगा फडकवला जाणार आहे. त्याद्वारे देशप्रेमाची भावना जागवली जाणार आहे. विविध दुकाने, आस्थापना यांच्यावरही तिरंगा फडकवला जाणार आहे. आपल्या राष्ट्रध्वजातील तिरंगा रंग केशरी, पांढरा आणि हिरवा हे रंग त्याग, धैर्य, प्रेम, शांतता आणि विश्वासाचे प्रतीक आहेत. नव्या पिढीत हीच प्रेरणा आणि विश्वास निर्माण करण्याचे काम हे अभियान करणार आहे," असेही ते म्हणाले. यावेळी मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.