गणपती विशेष २०३१ बसेस फुल्ल

एसटीच्या ग्रुप आरक्षणास उदंड प्रतिसाद..!

    05-Aug-2024
Total Views |

Bus
 
मुंबई : गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. यंदाच्यावर्षी दि.०७ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे एसटीच्या १३०१ बसेस गट आरक्षणासह एकूण २०३१ जादा बसेस आतापर्यंत फुल्ल झाल्या आहेत.
 
यंदाच्या वर्षी गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने दि. २ सप्टेंबर ते दि.०७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २ सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
 
गणेशोत्सव कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा , कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. मुंबई तुन कोकणात थेट आपल्या गावी अगदी वाडी-वस्ती पर्यंत फक्त एसटीच चाकरमान्यांना सुखरूप पोहोचवते. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा एसटीतर्फे सुमारे ४३०० जादा गाड्या सोडण्यात येणार असून त्यापैकी २०३१ बसेस फुल्ल झाल्या आहेत.
 
गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, २ ते ७ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृह उभारण्यात येणार आहेत.