सध्या पुणे जिल्ह्यात तसेच विशेषतः घाटमाथ्यावर दमदार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. जून महिन्यात पाठ दाखविणार्या या पावसाने जुलैमध्ये जोरदार हजेरी लावून सगळ्यांचीच झोप उडविली. भविष्यातील पाण्याच्या नियोजनासाठी हा पाऊस उपयुक्त आहे, यात संदेहच नाही. मात्र, तो आल्यावर ज्या काही दुर्घटना घडल्या किंवा ज्या पद्धतीने अथवा ज्या पॅटर्नमध्ये पाऊस आजकाल पडतोय, त्यामुळे आपत्ती निवारण यंत्रणांना देखील चक्रावल्यासारखे होते. काल दि. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच पर्यंत लोणावळ्यात ४१.५ मिमी पावसाची नोंद झाली, तर शिवाजी नगरात १०.९ मिमी इतकी. धरण क्षेत्रात पाऊस बरसल्याने भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीला पुरविल्या जाण्याचा प्रश्न देखील बहुतांशी सुटला आहे.खडकवासला धरणात १.४४ टीएमसी पाणी असून ही टक्केवारी ७२.८३ टक्के इतकी. यात अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा की, आजकाल कोणत्याही गोष्टीवर राजकारण करून चांगले काम करणार्या सरकारला बदनाम करायचे, हा जो ट्रेंड आलेला आहे, त्याला या पावसाने चपखल उत्तर तर दिलेच आहे. मात्र, पावसामुळे कोठेही प्रशासकीय अनागोंदी किंवा निष्काळजीपणामुळे भरमसाठ जीवितहानी झाली किंवा खूप मोठे मालमत्तेचे नुकसान झाले, असे काहीही घडले नाही. नाही म्हणायला विरोधकांनी पुण्यातील एकतानगर आणि अन्य काही परिसरात मुसळधार पावसाने जे नागरिकांचे हाल झाले, त्यावरून पुन्हा हा बदनामीचा कट रचला होता. मात्र, नुकसानग्रस्तांच्या घरापर्यंत जाऊन सत्तेतील लोकांनी चक्क त्यांच्या सामान्य जीवन जगण्यासाठी जे तत्परतेने प्रयत्न केले, त्यामुळे आपसुकच या विरोधकांची तोंडे बंद झाली. काहींनी येथे येऊन कोल्हेकुईदेखील केली. मात्र, सर्वकाही व्यवस्थित सुरू असल्याने त्यांना सकाळचे भोंगे वाजविण्याची संधीच मिळाली नाही, हेच या सरकारच्या तत्पर कार्यपद्धतीचे यश संकटात सापडलेल्यांनी अनुभवले म्हणून ही नोंद. पावसाचे नियमित येणे सुखकर असले, तरी त्याचा एकूणच बदललेला पवित्रा, हे भविष्यासाठी नक्कीच गांभीर्याने विचार करायला लावणारा. त्यामुळे संबंधित यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन यादृष्टीने योग्य पाऊलं उचलतील, अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही.
पुणे जिल्ह्यावर जशी पावसाने कृपा केली, तशी भरभरून कृपा केंद्र आणि राज्यात असलेल्या भाजपप्रणित सरकारने देखील केली आहे, हे येथे आवर्जून नमूद करावे वाटते. या भागातील पायाभूत सुविधांचा विकास आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने लक्ष ठेवून करीत असलेले विकासकार्य पुण्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील पिढ्यांच्या प्रगतीसाठी पोषक असेच. विशेष म्हणजे, पुणेकरदेखील या विकासकामांना त्याच तत्परतेने प्रतिसाद देत आहेत, हे देखील मेट्रो प्रवास पसंतीने दाखवून दिले. ही तर केवळ एक झलक आहे, नुकतेच पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल खुले झाल्याने, हवाई प्रवास करणार्यांना देखील सुलभ झाले असून, दररोज लाखांच्यावर लोक मेट्रोतून प्रवास करीत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किती महत्त्वाची आहे, हे दर्शविणारा हा प्रतिसाद समाजाच्या शहाणपणाचे लक्षण अधोरेखित करतो. कारण, कोणत्याही गोष्टीवर उठसूठ राजकारण करणारे काही लोक थोडं काही पुण्यात चांगलं सुरू झालं की, बदनामी करायला टपलेलेच असतात. मात्र, सुज्ञ पुणेकर अशा नतद्रष्टांच्या अपप्रचाराला पुरून उरले आहेत. आता रेल्वेसाठी देखील नवे टर्मिनल, नव्या रेल्वे सेवा, वंदे भारत ट्रेन अशा सुविधा पुणेकरांसाठी उपलब्ध होणार आहेत. नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात देखील नदी सुधार प्रकल्प आणि मेट्रोसाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे पुण्याला आज जे ‘वाहतूककोंडीचे शहर’ म्हणून बदनाम केले जाते, त्यास आळा बसणार आहे. नागरिकांनी देखील यासाठी सकारात्मक प्रतिसाद देण्यास सुरूवात केली आहे. नागरिकांच्या या सकारात्मकतेमुळेच सरकारदेखील येथील नागरिकांना ‘तुला देतो पैसा’ म्हणून खुश आहे, असे म्हणायला हरकत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर सदैव अग्रेसर राहणारे हे महानगर विकसित भारतासाठी योगदान देत राहिल्यास याचा लाभ सर्वार्थाने नागरिकांनाच होणार आहे. केवळ त्यासाठी सकारात्मकदृष्टी असायला हवी. विरोधक नको तो अजेंडा लोकांसमोर नेऊन केवळ सरकारच्या बदनामीचे प्रयत्न करीत असतात. त्यास पुणेकरांनीच हाणून पाडले, तर भविष्यात पुणे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिकप्राप्त महानगर म्हणून झळकेल, यात संदेह नाही!
अतुल तांदळीकर