डोंबिवली : ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेला आयआरबी कंपनीचा दहिसर टोलनाका बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.मनसेचे आमदार प्रमोद(राजू) पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री (टोल आणि सार्वजनिक प्रकल्प) दादा भुसे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार पाटील यांनी लेखी निवेदन देखील मंत्री भुसे यांना दिले आहे.
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग-४ (नवीन ४८) यावर अवजड व हलक्या वाहनांकडून आयआरबी कडून टोल वसूल केला जात आहे. या टोल नाकाची मुदत २०१९ मध्ये संपली होती. परंतु पुन्हा एम.एस.आर.डी.सी. कडून पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.मात्र टोल वसुली साठी रस्ता पूर्ण व सुस्थितीत असणे आवश्यक असते. परंतु या महामार्गाची दुरवस्था झाली असून जागोजागी भले मोठे खड्डे,गटारांची व्यवस्था नाही,कलव्हर्ट(मोऱ्या) नाहीत.या महामार्गावर मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पाणी साचलेले असते यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.
तसेच या महामार्गावरील अपघातांमध्ये अनेकांनी जीव गमावले असून कित्येकजण जखमी झाले आहेत. सद्य परिस्थितीत महामार्गाच्या चार लेन कार्यरत नसताना ही टोल वसुली जोरात सुरू असल्याचे सांगत एम.एस.आर.डी.सी. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पत्रात पाटील यांनी केला आहे.
महामार्गावरील समस्यांबाबत पाटील यांनी एम.एस.आर.डी. सी.च्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष दौरे करून रस्ता रुंदीकरण, दुरुस्ती, कन्व्हल्टं करण्याच्या सूचना केल्या होत्या यावेळी आयआरबी चे अधिकारी देखील उपस्थित होते. मात्र त्यानंतर अद्यापही परिस्थिती जैसे थे आहे.त्यामुळे तातडीने चौकशी करून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील दहिसर टोल तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.