"शरद पवार गटाची यात्रा म्हणजे छत्रपती शिवरायांच्या नावावर...;" भाजपची टीका
10-Aug-2024
Total Views |
मुंबई : शरद पवार गटाची यात्रा म्हणजे छत्रपती शिवरायांच्या नावावर मतं मिळवण्याचा मनसुबा आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने शरद पवार गटाने शिवस्वराज्य यात्रा सुरु केली आहे. यावर आता भाजपने टीका केली.
केशव उपाध्याय म्हणाले की, "शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेली तथाकथित शिवस्वराज्य यात्रा म्हणजे निव्वळ निवडणूक नजरेसमोर ठेवून केलेला फार्स आहे. अन्यथा ज्या छत्रपती शिवरायांच्या नावावर मतं मिळवण्याचा मनसुबा यांनी रचलेला आहे त्याच शिवरायांच्या वाघनखांवर यांनी शंका घेतली नसती. छत्रपतींच्या अजोड पराक्रमाचं आणि औरंगजेबाच्या नामुष्कीचं प्रतीक असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरचं महायुती सरकारनं केलेलं नामकरण यांच्या पोटदुखीचं कारण ठरलं नसतं. अगदी ताजे उदाहरण असलेला वक्फ बोर्डाच्या कारभारात पारदर्शकता आणणारा नवा कायदा पाहून यांना पोटशूळ उठला नसता. कौतुक आक्रमकांचं आणि यात्रा शिवरायांच्या नावाने, असला स्वराज्यद्रोही प्रकार यांनी केला नसता," असा घणाघात त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "याउलट, ‘मऱ्हाटा पातशाह एवढा छत्रपती जाला, ही गोष्ट काही सामान्य जाहली नाही’ हा देदीप्यमान इतिहास स्मरणात ठेवून महायुती सरकारने छत्रपती शिवरायांचा ३५० वा शिवराज्याभिषेक दिन मराठी गौरवाला साजेशा इतमामाने राज्यभरात मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला. शिवरायांच्या शिकवणुकीप्रमाणे रयतेची काळजी वाहणारा राज्यकारभार आमच्या सरकारकडून सुरू आहे. सर्व समाजघटकांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवून शिवरायांच्या कल्याणकारी राज्याची संकल्पना आम्ही प्रत्यक्षात उतरवली."
"नुकतीच राज्यातल्या माय-माऊलींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली. पण विरोधक मात्र रांझ्याच्या पाटलाप्रमाणे या योजनेत मोडता घालण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बाब लपून राहिलेली नाही. म्हणूनच शिवरायांच्या विचारांची पालखी महायुतीने समर्थपणे आपल्या खांद्यांवर पेलली आहे. तर महाविकास आघाडी नुसतीच शब्दांची भोई बनली आहे," असेही ते म्हणाले.