अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल, मुस्लिम पक्षाला जबर धक्का
01-Aug-2024
Total Views | 48
नवी दिल्ली :अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी कृष्ण जन्मभूमी-शाही इदगाह मशीद वादात हिंदू बाजूने दाखल केलेले १८ दावे सुनावणीयोग्य असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे हिंदू समाजाचे विजयाकडे आणखी एक पाऊल पडले असल्याचे मानले जाते. देवता आणि हिंदू पक्षांनी दाखल केलेल्या दाव्यांच्या मेंटेनिबिलिटीस अर्थात दावे सुनावणीयोग्य असण्यास शाही इदगाह मशिदीच्या व्यवस्थापनाने आव्हान दिले होते.
त्यासाठी मुस्लिम पक्षाने १९९१ सालच्या उपासनास्थळे कायद्याचा हवाला दिला होता. हिंदू पक्षाचे दावे हे सुनावणीयोग्य नाही, असा त्यांनी दावा केला होता. मात्र, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांनी मुस्लिमांचा दावा फेटाळला आहे.उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मथुरा मंदिर मशीद वादातील हिंदू बाजूच्या याचिका सुनावणीस पात्र ठरल्या आहेत.
मुस्लिम बाजूचा आक्षेप उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर हिंदू बाजूच्या याचिकांवर पुढील सुनावणी होणार आहे. अयोध्या वादाच्या धर्तीवर श्रीकृष्ण जन्मभूमी वादावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.न्यायालयात हिंदूंच्या बाजुने वकील विष्णू शंकर जैन, देवकीनंदन शर्मा, प्रभा पांडे आणि प्रदीपकुमार शर्मा यांनी तर मुस्लिमांच्या वतीने वकील तस्नीम अहमदी, नसिरुझ्झमन, गुलरेझ खान, हरे राम, नसिरुझमान आणि पुनित कुमार गुप्ता यांनी बाजू मांडली.
असे आहेत दावे – प्रतिदावे
हिंदू पक्ष
· ईदगाहचा संपूर्ण अडीच एकर परिसर भगवान श्रीकृष्णा विराजमान यांचे गर्भगृह आहे.
· शाही ईदगाह मशीद समितीकडे अशा जमिनीची कोणतीही नोंद नाही.
· श्रीकृष्ण मंदिर पाडून शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली आहे.
· मालकी हक्क नसताना वक्फ बोर्डाने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता ही जमीन वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केली आहे.
मुस्लिम पक्ष
· या जमिनीबाबत १९६८ मध्ये दोन्ही पक्षांमध्ये करार झाला होता, असा मुस्लीम पक्षकारांचा युक्तिवाद आहे.
· ६० वर्षांनंतर झालेल्या कराराला चुकीचे म्हणणे योग्य नाही.
· हे प्रकरण प्रार्थना स्थळ कायदा १९९१ अंतर्गत सुनावणीयोग्य नाही.
· १५ ऑगस्ट १९४७ रोजी धार्मिक स्थळाची ओळख आणि स्वरूप कायम राहील, म्हणजे त्याचे स्वरूप बदलता येत नाही; असे निश्चित करण्यात आले होते.