"मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलाय का?"

भाजप गटनेते दरेकरांचा जरांगेंना सवाल

    22-Jul-2024
Total Views |
maratha samaj manoj jarange


मुंबई :       
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी अण्णासाहेब पाटील यांच्यापासून अनेक नेत्यांनी आंदोलने केली, बलिदान दिले. अनेक नेत्यांनी प्रचंड काम केले, अभ्यास करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे. तुमच्या एका भूमिकेवर विषय मांडला तर मराठा समाजाचा अपमान कसा काय होतो. मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलाय का? असा सवाल भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.




दरेकर म्हणाले की, जरांगे यांनी सबुरीने घेण्याची गरज आहे. तुम्ही मॅनेज होत नाहीत हिच तुमची ताकद, सामर्थ्य आहे. हे मराठा समाजाला माहित आहे. म्हणून समाज आपल्या पाठीशी उभा आहे. पण तुम्हाला कुणी काही बोललं तर त्याला शिवराळ भाषा, एकेरी, हमरीतुमरी बंद केले पाहिजे. गरीब कुटुंबातून येऊन आम्ही प्रगती केली. सगळेच शिव्या सहन करणारे नसतात. संयमाने बोला. मागण्या ताकदीने मांडा आम्ही सोबत आहोत. अभ्यास करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. तुमच्या एका भूमिकेवर विषय मांडला तर मराठा समाजाचा अपमान कसा काय होतो. मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलाय का? असा सवालही दरेकरांनी केला.

दरेकर पुढे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी सत्तेत यावे. सत्तेत येऊन मराठा समाजाला न्याय द्यावा. आता सत्तेत आहेत त्यांच्याकडून दिरंगाई होतेय त्याची कारणेही त्यांना समजतील. त्यांनी सत्तेत यावे यासाठी आमच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत. परंतु विशिष्ट लोकांना नजरेसमोर ठेऊन आपले टार्गेट करू नका. भाजप आणि फडणवीस यांचे उमेदवार पाडणार म्हणजे डाल मे कुछ काला है असा संशयही दरेकरांनी व्यक्त केला. तसेच तुमचा उद्देश हा भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपवणे हा आहे का? मराठा समाज हा सर्व पक्षांत आहे. समाजात विभाजन होऊ नये याकरिता समाज शांततेत आहे. पण मी बोलेन तेच समाज या अविर्भावातून जरांगे यांनी बाहेर यायला पाहिजे, अशी विनंतीही दरेकरांनी केली.

जरांगे एकप्रकारे महाविकास आघाडीचा बचाव करत आहेत. त्यांनी शरद पवारांना, उद्धव ठाकरें, काँग्रेसच्या नेत्यांना विचारावे की ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यावर भूमिका काय? या तिन्ही पक्षांना काहीच विचारायचे नाही कारण सरकारला सर्व जातीधर्मांना एकत्रित करून निर्णय घ्यावा लागतो. दरेकर पुढे म्हणाले की, आपल्या नेतृत्वाखाली सरकार येणार असे जर अमित शहा म्हणाले तर त्याचे वेगळे अर्थ काढण्याचे कारण नाही. त्याच अधिवेशनात राज्याचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपण कोण मुख्यमंत्री होणार याच्या चर्चा बंद करा, मुख्यमंत्री महायुतीचाच होईल असा विश्वासदेखील दरेकरांनी व्यक्त केला.