महाराष्ट्राला जागतिक आर्थिक केंद्र बनवणारं !

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास

    13-Jul-2024
Total Views |

dcm


मुंबई, दि.१३ : विशेष प्रतिनिधी 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर शनिवार दि.१३ रोजी ते पहिल्यांदा मुंबईत आले होते. या पहिल्याच दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २९०० कोटींच्या प्रकल्पांचे लोकापर्ण आणि भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना, ‘माझं ध्येय मुंबईला जगाची थिंक टॅक कॅपिटल बनवायची आहे. महाराष्ट्र टुरिझममध्ये भारतातील नंबर वन राज्य बनावं. भारतात विकासाची नवी गाथा लिहिण्याचं काम महाराष्ट्र करत आहे. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. हा कार्यक्रम हेच ध्येय गाठण्यासाठी आहे.' असे महाराष्ट्राबद्दल गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून सुरुवात केली. ते म्हणाले, “आज मला महाराष्ट्र आणि मुंबईसाठी तीस हजार कोटींच्या प्रकल्पासाठी भूमिपूजन आणि लोकार्पणाची संधी मिळाली. या प्रकल्पांमुळे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील कनेक्टिव्हिटी अधिक चांगली होईल. यात रोड आणि रेल्वेव्यतिरिक्त महाराष्ट्रातील नवतरुणांना कौशल विकासासाठी खूप मोठी योजनाही समाविष्ट आहे. यातून महाराष्ट्रात मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होईल.”

“गेल्या एक महिन्यापासून मुंबई देश विदेश गुंतवणुकांच्या उत्सवाची साक्षीदार बनली आहे. लहान मोठ्या गुंवणूकदारांनी आमच्या सरकारच्या तिसऱ्या टर्मचं उत्साहाने स्वागत केलं आहे. लोकांना माहीत आहे की एनडीए सरकारच स्थिरता देऊ शकेल. स्थायित्व देऊ शकतं. तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मी म्हटलं होतं की, तिसऱ्या टर्ममध्ये एनडीए सरकार तिप्पट वेगाने काम करणार आहे. आणि आज आम्ही हे होताना पाहु शकतोय”, असेही या कार्यक्रमात मोदी म्हणाले.

“महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास आहे, महाराष्ट्राकडे सशक्त वर्तमान आहे, महाराष्ट्राकडे समृद्ध भविष्याची स्वप्ने आहेत. महाराष्ट्रकडे उद्योगांची पॉवर आहे, शेतीची पॉवर आहे, फायनान्स सेक्टरची पॉवर आहे. याच पॉवरने मुंबईला देशाचे फायनान्स हब बनवले आहे. महाराष्ट्राच्या याच पॉवरने महाराष्ट्राला आर्थिक पॉवर हाऊस बनवायचे आहे. माझे लक्ष्य आहे की,मुंबईला जगाचे थिंक टँक कॅपिटल बनवणार. महाराष्ट्र टुरिझममध्ये भारतातील नंबर वन राज्य बनेल”, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

“महायुती सरकारचं हेच लक्ष्य आहे. २१ व्या शतकात भारताच्या आकांक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी उत्तम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईत कोस्टल रोड आणि अटल सेतू आता पूर्ण झाले आहेत. तुम्हाला आठवत असेल की अटल सेतू तयार होत होतं, तेव्हा याविरोधात अनेक गोष्टी पसरवल्या गेल्या. परंतु, याच अटल सेतूचा आता प्रचंड फायदा होत आहे”, असेही मोदी म्हणाले.

मुंबई दौऱ्यात पंतप्रधानांनी विरोधकांवर देखील जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘रोजगारावरून खोटे नरेटिव्ह सेट करणाऱ्यांची बोलती बंद केली. खोटे नरेटिव्ह सेट करणारे गुंतवणुकीचे दुश्मन आहेत. इन्फ्रास्ट्रकरच्या निर्मितीतील दुश्मन आहेत, भारताच्या विकासाचे दुश्मन आहे. यांचं धोरण तरुणांचा विश्वासघात आणि रोजगार रोखणारी आहे. त्यांची पोलखोल होत आहे. त्यांचं खोटेपण उघड होत आहे. पूल तयार होत असेल, रेल्वे ट्रॅक होत असेल रोड होत असेल तर कुणाला तरी रोजगार मिळतोच. देशात इन्फ्रास्ट्रक्चरची गती वाढत आहे, तसेच रोजगाराची गतीही वाढत आहे. येत्या काळात अधिक संधी निर्माण होणार आहे.’