पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने अनिल परब यांची कोल्हेकुई सुरु!
26-Jun-2024
Total Views | 194
मुंबई : पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने अनिल परब यांची कोल्हेकुई सुरु आहे, अशी टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक या चार जागांच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. दरम्यान, यावेळी शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आशिष शेलार म्हणाले की, "मुंबईतील पदवीधर सुज्ञ असून परिपूर्ण विचार करणारा आहे. त्यामुळे ते एक सच्चा मुंबईकर, एक ईमानदार, पर्यावरणप्रेमी, लेखक आणि संपादक असलेल्या किरण शेलार यांना ते संधी देतील, असा माझा पूर्ण विश्वास आहे. या निवडणूकीत ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे, त्यानुसार प्रथम फेरीतच ही निवडणूक आम्ही जिंकू, असा आमचा दावा आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अनिल परब यांनी केलेल्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, "निवडणूक आयोगाने तयार केलेली पद्धत ही सर्व उमेदवारांसाठी सारखे आहे आहेत. अनिल परब यांना पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने त्यांची कोल्हेकुई सुरु आहे. मातोश्रीच्या प्रांगणात कधी शिवसेना जिंकली आहे का? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. त्यांना एवढीच खुमखुमी असेल तर मातोश्री असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून त्यांनी कधीतरी स्वत: निवडणूकीला उभं राहावं," असं आव्हानही आशिष शेलारांनी दिलं आहे.