इतिहासप्रेमी ‘संभाजी’

    21-Jun-2024
Total Views | 88
Sambhaji Shelke


शिक्षकी पेशातून राष्ट्रनिर्माणाचा वसा घेत, शिवछत्रपतींचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारे इतिहासप्रेमी प्रा. संभाजी राजाराम शेळके यांच्याविषयी...

'शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी ते प्राशन करील, तो नक्कीच वाघासारखा गुरगुरेल. शिकला तो टिकला. तेव्हा, शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक हवा,’ असे सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, साने गुरूजी, सावित्रीबाई फुले आदी महापुरुषांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. तद्वत, माँसाहेब जिजाऊंनी शिवछत्रपतींवर जे संस्कार केले, तसे संस्कार प्रत्येक बालकावर व्हावे, यासाठी झटणारे इतिहासप्रेमी शिक्षक प्रा. संभाजी शेळके. त्याचा जन्म 1975 साली सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात शेळकेवाडी (येवती) येथे झाला. घरची परिस्थिती तशी बेताचीच. मिळेल ती चटणी-भाकरी रुमालात बांधून दररोज चार-पाच किमी पायपीट करून गावातील शाळेत त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. सातवीनंतर चुलत्यांनी संभाजीला शिक्षणासाठी मुंबईला आणले. ठाण्यातील वर्तकनगरस्थित ब्राह्मण विद्यालयामध्ये दहावीपर्यंत शिकल्यानंतर ज्ञानसाधना महाविद्यालयात बारावी पूर्ण करून, नंतर कल्याण येथील के. एम. अग्रवाल महाविद्यालयामध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असताना इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांमध्ये अर्धवेळ नोकरी केली.

 शिक्षण पूर्ण करताना दगदग खूप व्हायची, प्रवासात वेळही जायचा. त्यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक किरण चव्हाण सर देवासारखे धावून आले. त्यांनी स्वतःची खोली अभ्यासासाठी उपलब्ध करून दिल्याने रात्रंदिवस अभ्यास करून वर्गात पहिले येण्याचा मान त्यांनी पटकावला. पुढे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यातील चाणक्य मंडळामध्ये प्रवेश घेतला. परंतु, आर्थिक अडचण असल्यामुळे अविनाश धर्माधिकारी सरांसोबत काम करत एम.ए. पूर्ण केले. धर्माधिकारी सर, अद्वैत मेहता, मंदार फणसे, संजीवनीताई जोगळेकर यांनी प्रेरणा दिल्यामुळे आयुष्यात काहीतरी करावे, ही जिद्द निर्माण झाली. 1999 साली बीएडचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संभाजी शेळके गडहिंग्लजच्या निओरा या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून रूजू झाले. तेथे विनायक भुईबर आणि कोसु बार्देस्करया मित्रांची साथ लाभली. शाळेत एक वर्ष नियोजनपूर्ण काम केले. सन 2000 मध्ये ठाण्यातील ‘आदर्श विकास मंडळा’च्या कर्मवीर भाऊराव पाटील (केबीपी) महाविद्यालयात सेवेची संधी मिळाली. संस्थेचे अध्यक्ष बी. बी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने शैक्षणिक यज्ञाचा श्रीगणेशा केला. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सचिन मोरे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली प्रा. शेळके यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला. आई-वडील, गुरूवर्य, मित्रपरिवार यांच्यामुळे प्रेरणा मिळत गेली अन् 25 वर्षे या संस्थेत कार्यरत असल्याचे प्रा. शेळके सांगतात.

आपण समाजाचे काही देणे लागतो, या विचाराने प्रा. शेळके यांनी आपले व्यवसायाने वकील असलेले मित्र मनोज बडगुजर यांच्या ‘राजे संस्कार प्रतिष्ठान संस्थे’च्या माध्यमातून इतिहास प्रबोधनाच्या चळवळीमध्ये झोकून दिले. ‘शिवाजी जन्मावा... पण शेजारच्या घरात’ म्हणणार्‍यांना प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्रातील बालकांसाठी प्रा. शेळके यांनी अनेक उपक्रम राबवले. दर दिवाळीत किल्ले स्पर्धा तसेच गड-किल्ले सफर घडवली. लाठी-काठी, दांडपट्टा आदी शिवकालीन खेळांचे मार्गदर्शनही बच्चेकंपनीला केले. नवनवीन ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देऊन शिवकालीन साम्राज्याची ओळख लहान मुलांना व्हावी, यासाठी ते सतत धडपडत असतात. दरवर्षी समाजातील कीर्तिवंत महिलांना ‘नवदुर्गा सन्मान पुरस्कार’ देऊन सन्मानितही केले. या सर्व इतिहास प्रेमामुळे संभाजी शेळके नुसतेच संभाजी राहिले नाहीत, तर समाजाने त्यांना ‘बाळराजे’ पदवी बहाल केल्याचे ते सांगतात. प्रा. शेळके जेव्हा इतिहास शिकवतात, तेव्हा विद्यार्थी तहान-भूक हरपून जातात. विद्यार्थीही त्यांच्या तासिकेला न चुकवता इतिहासात रमतात. मुख्यतः लहान मुलांवर शिवकालीन संस्कार व्हावे, ही त्यांची इच्छा असून यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अनाथ मुलांप्रती आत्मीयता बाळगून त्यांनी एक नवा पायंडा पाडला आहे.

आपल्या मावळ्यांना त्यांनी फर्मान सोडले. यापुढे वाढदिवस साजरा करायचा तो अनाथालयात. तेव्हापासून, सर्वजण आपला वाढदिवस अनाथाश्रमात लहानग्यांसोबत साजरा करतात. याशिवाय, दुर्गम भागात आदिवासी पाड्यात जाऊन तेथील गरीब, गरजूंनाही ते मदतीचा हात देत असतात. प्रा. शेळके यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाविद्यालयामध्ये शिकताना कबड्डीमध्ये सतत दोन वर्षे उत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार मिळाला. ‘एनएसएस’चा आदर्श विद्यार्थी पुरस्कार, तर महाविद्यालयामध्ये शिकवताना दोन वेळा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्राप्त झाला. कळव्यातील नागरिकांतर्फे त्यांना इतिहासाचार्य हा पुरस्कारही देण्यात आला आहे. याशिवाय, विविध संस्थांकडून सन्मान होतच असतात. भविष्यात त्यांना शिवविचारांचा प्रचार आणि प्रसार करायचा असून, अनाथांकरिता एक आदर्श वृद्धाश्रम उभारण्याचा मानस आहे. युवा पिढीला संदेश देताना ते “परिस्थिती कशीही असू दे, ती बदलण्याची ताकद आपल्यामध्ये असते. तेव्हा, केवळ त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक हवा,” असे ते सांगतात. अशा या इतिहासप्रेमी संभाजीला पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!


(अधिक माहितीसाठी संपर्क : 9321884566)
दीपक शेलार


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121