अफवा, फेक न्यूज, मिस इन्फर्मेशन, नॅरेटिव्ह

    21-Jun-2024
Total Views |
Fake Narrative


अफवा, फेक न्यूज, मिस इन्फर्मेशन, नॅरेटिव्ह या शीर्षकात नमूद केलेल्या चारही शब्दांचा पुरेपूर प्रत्यय लोकसभा निवडणुकांदरम्यान आलाच. विशेषत्वाने ‘संविधान खतरे में हैं’च्या ‘नॅरेटिव्ह’ने तर रालोआच्या उमेदवारांची कित्येक ठिकाणी पीछेहाट झाल्याचे विश्लेषणाअंती समोर आले. पण, अफवा, फेक न्यूज, मिस इन्फर्मेशन, नॅरेटिव्ह ही वर्तमानाची अपत्ये नसून, अगदी महाभारतकाळ, ब्रिटिशकाळातही या अस्त्रांचा पुरेपूर वापर करण्यात आला. यासंबंधीच्या अशाच काही रंजक कथा...

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. कर्जत स्थानकाबाहेरून पहाटे ५ वाजता खांडस या गावासाठी एक लाल डब्बा एसटी सुटत असे. मुंबई परिसरातल्या सगळ्या ट्रेकर्सची ही आवडती बस होती. कारण, कर्जतहून खांडसला पोहोचून, सूर्योदय होण्यापूर्वी, भीमाशंकर या प्रख्यात, प्राचीन तीर्थक्षेत्राकडे जाणारा निसर्गसुंदर गणपती घाट किंवा अवघड असा शिर्डीघाट या वाटांनी मार्गक्रमण सुरू करण्याची निकड असे. पुण्याच्या बाजूने मोठा गाडीरस्ता थेट वरपर्यंत जातो. पण, मुंबईच्या बाजूने म्हणजे कोकणातून खांडसमार्गे भीमाशंकरला जाणारा हा पुरातन घाटमार्ग ट्रेकर लोकांसाठी स्वर्ग आहे. आम्ही जवळपास २५ ट्रेकर कर्जत-खांडस एसटीच्या चिंचोळ्या दारापाशी गर्दी करून राहिलो होतो. पाठीवर मोठमोठ्या हॅवरसॅक होत्या. तेवढ्यात कुणीतरी मागून जोरात ओरडलं, ‘’अरे, ही खांडस गाडी नाही.” झालं! आमचे गाडीत घुसून, जागा पटकावून बसण्याचं अवसान ओसरलं. आमचा गट मागे सरकला. त्याबरोबर मागे उभे असलेले दहा-बारा स्थानिक लोक भराभर आत शिरले. त्यांनी पुढच्या शिटा, खिडक्या पकडल्या. मग यांच्यातला एक जण खुदुखुदु हसत आम्हाला म्हणाला, ‘’बसा, बसा. ही खांडस गाडीच आहे!” एका अगदी साध्या अफवेने त्या स्थानिक मंडळींनी आम्हाला छानपैकी ‘मामा’ बनवलं होतं.

हे अफवांचं सामर्थ्य आहे. यादव आणि जरासंध यांच्या युद्धात जरासंधाच्या बाजूने हंस आणि डिंभक नावाचे दोन फार पराक्रमी वीर लढत होते. ते दोघे एकमेकांचे जिवलग मित्र होते. कृष्णाने हंस ठार झाला आहे, अशी अफवा सोडून ती डिंभकाच्या कानांवर जाईल, अशी व्यवस्था केली. मित्र ठार झाला या दुःखाने, डिंभकाने त्या वार्तेची कसलीही शहानिशा करून न घेता, आपल्याच हातातली तलवार पोटात खुपसून रणांगणावरच आत्महत्या केली. कृष्णाने लगेच ती वार्ता हंसाच्या कानांवर पडण्याची व्यवस्था केली. मित्र शोकाने वेडा होऊन हंसानेही लगेच रणांगणावरच आत्मघात करून घेतला. म्हणजे नुसत्या अफवेने कृष्णाने शत्रू पक्षातले दोन मोठे योद्धे संपवले. पुढे महाभारतीय युद्धात तर त्याने कमालच करून सोडली. कौरव-पांडव या सगळ्यांचेच गुरु आणि उभ्या भारतवर्षातले एक महान धनुर्धर असणारे द्रोणाचार्य यांचा पाडाव करण्यासाठी कृष्णाने प्रथम अश्वत्थामा नावाचा एक हत्ती मारवला आणि रणांगणावर अफवा सोडून दिली- अश्वत्थामा मेला. दुःखविव्हल झालेल्या द्रोणाचार्यांनी खरं तेच बोलणार्‍या युधिष्ठिराला प्रश्न केला, ’‘खरंच अश्वत्थामा मेला का?” युधिष्ठिराने उत्तर दिलं ’‘अश्वत्थामा मेला” आणि मग तो हळूच पुटपुटला, ‘’मात्र तो नर की कुंजर (हत्ती) ते माहीत नाही.”

अफवा किंवा ’फेक न्यूज’ मधला हा उपप्रकार म्हणजे ’मिस इन्फर्मेशन.’ अनेकदा अशा जाहिराती बघतो की, आमचं उत्पादन कधीच बिघडणार नाही, अशी छातीठोक ग्वाही मोठमोठ्या अक्षरांमध्ये छापलेली असते आणि मग खाली कुठेतरी ’फाईन प्रिंट’मध्ये म्हणजे अगदी बारीक अक्षरांत छापलेलं असतं की, हे उत्पादन बिघडल्यास आमचं सर्व्हिस सेंटर दिल्लीबिल्ली कुठेतरी आहे. काही कज्जा-खटला उपस्थित झाल्यास न्यायालयीन कक्ष पंजाब किंवा हरियाणा अशी कुठेतरी आहे. म्हणजे व्यापार करताना महाराष्ट्रात, पण सगळ्या भानगडी कुठेतरी दूरच्या भागात. आता या अफवा, फेक न्यूज, मिस इन्फर्मेशनचा आणखी पुढचा प्रकार म्हणजे नॅरेटिव्ह किंवा विमर्श, कृष्णाने या गोष्टींचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी केला. तसा अलीकडल्या काळातला नॅरेटिव्ह सेटिंगचा चांगला उपयोग म्हणजे नेताजी सुभाषचंद्रांची प्रसिद्ध घोषणा- ‘चलो दिल्ली!’ सुभाषबाबू, त्यांची ‘आझाद हिंद सेना’ आणि ‘चलो दिली’ ही घोषणा किंवा आजच्या भाषेत ‘नॅरेटिव्ह’ यांनी भारतीय तरुणांवर फार मोठी मोहिनी घातली होती. इंग्रज तर चिंतेत पडलेच होते, पण नेताजींची लोकप्रियता अशीच वाढत राहिली, तर आपलं कसं होणार, म्हणून काँग्रेसवाले जास्तच चिंतेत पडले होते.

तसाच अतिशय लोकप्रिय झालेला दुसरा सकारात्मक नॅरेटिव्ह म्हणजे १९६५ साली पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेली घोषणा-’जय जवान, जय किसान’! सप्टेंबर १९६५च्या प्रारंभी झालेलं पाकबरोबरचं युद्ध जिंकल्यावर शास्त्रीजींनी ठिकठिकाणच्या विजयसभांमध्ये, आकाशवाणीवरून केलेल्या भाषणांमध्ये ही घोषणा दिली होती. पाकिस्तानवर विजय मिळवला आहे, तसाच अन्नधान्याच्या टंचाईवरही विजय मिळवू, असा नॅरेटिव्ह, असा विमर्श त्यांना जनतेपर्यंत पोहोचवायचा होता. पण, अफवांचा, विमर्शाचा असा सकारात्मक उपयोग निदान आपल्या देशात तरी कमीच झालेला दिसतो. नकारात्मक, विघातक उपयोगच जास्त नि तो करण्यात अर्थातच इंग्रज लोक आघाडीवर. दैववशात् आपण जिंकू शकलेला हा भारत देश आणि इथला हिंदू समाज आपल्यापेक्षा मुळातच श्रेष्ठ आहे. मग त्यांना जर अमर्याद काळापर्यंत आपले दास बनवून ठेवायचं असेल, तर यांची अस्मिता, यांचा आत्मसन्मान, या भरतभूमीबद्दल त्यांना वाटणारा मातृभूमीचा भाव, हाच तोडून टाका. १८५३ साली इंग्रजांनी मॅक्समुलर या विद्वानाकरवी एक अफवा सोडून दिली की, आर्य हा एक मानववंश असून, या आर्यांनी भारतावर आक्रमण करून तिथल्या मूळ निवासी द्रविड लोकांना जिंकून गुलाम बनवले.

आजचे भारतीय लोक म्हणजे, या आर्य-अनार्य वंशीयांची भेसळ आहे. मॅक्समुलरने सिद्धांत म्हणून स्थापित केलेल्या या अफवेला त्याच्या समकालीन पाश्चिमात्य विद्वानांनी आव्हान दिलं, इतकंच नव्हे तर याची टिंगलसुद्धा केली. इंग्रजांनी ती अफवा भारतीयांच्या शिक्षणक्रमात सिद्धांत म्हणूनच आणली. या अफवेतून न बोलता निघणारा ‘नॅरेटिव्ह’ असा होता की, अरे, भारतीय लोकांनो, तुम्ही सगळे परकीय आक्रमकांचे लेकावळे-मिश्र संतती ‘बास्टर्ड’ आहात. तुम्ही या भरतभूमीबद्दल प्रेम बाळगण्याचं कारण नाही. कारण, तुमच्या बापजाद्यांची ही मूळ भूमी नाहीच. काही शतकांपूर्वी या भूमीवर आर्यांनी आक्रमण केलं. मग इस्लामी तुर्कांनी केलं. सध्या आम्ही (इंग्रज) इथे राज्य करीत आहोत. याबद्दल तुम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही. गेली किमान पावणेदोनशे वर्षे ’आर्य आक्रमण सिद्धांत’ ही ‘फेक न्यूज’ आणि वर दिलेला ‘फेक नॅरेटिव्ह’ आम्हा हिंदूंच्या मनांवर राज्य करतो आहे. तो ‘फेक नॅरेटिव्ह’ फेकून देऊन आमची अस्मिता खडबडून जागी व्हावी म्हणून स्वामी विवेकानंदांपासून आज स्वामी गोविंददेव गिरींपर्यंत असंख्य साधुसंत, देशभक्त चंदनासारखे झिजत आहेत. पण, का एवढा आटापिटा करावा लागतोय या सर्वांना?

मायकेल वुड हे ब्रिटनच्या मँचेस्टर विद्यापीठातले एक ज्येष्ठ आणि नामवंत प्राध्यापक आहेत. विविध इतिहास विषयांवरची त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. बीबीसीसह अनेक वृत्तसंस्था, वृत्तवाहिन्यांवर त्यांचे कार्यक्रम, भाषणेे सतत चालूच असतात. त्यांच्या मँचेस्टर विद्यापीठाला यंदा २०० वर्षे पूर्ण झाली. ब्रिटनची कापड उद्योग राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मँचेस्टर शहरात १८२४ या वर्षी ‘मेकॅनिक्स इन्स्टिट्यूट’ आणि ‘रॉयल स्कूल ऑफ मेडिसिन अ‍ॅण्ड सर्जरी’ अशा दोन शिक्षणसंस्था सुरू झाल्या. यथावकाश त्या एकत्र येऊन ‘मँचेस्टर विद्यापीठ’ बनलं. म्हणून यंदाचं वर्ष त्याच्या द्विशताब्दीचं वर्ष आहे. आपल्याला ब्रिटन म्हटल्यावर लगेच ऑक्सफर्ड नि केंब्रिज एवढंच आठवतं. पण, मँचेस्टर विद्यापीठानेही अर्नेस्ट रुदरफोर्ड, ऑसबोर्न रेनॉल्ड्स, नीक्स भोर, जेम्स चॅडविक, आर्थर झूस्टर इत्यादी महान वैज्ञानिक; पॉल एर्डोस, होरेस लँब, अ‍ॅलन टुरिंग असे महान गणितज्ज्ञ आणि सॅम्युअल अलेक्झांडर, लुडविग विटजेनस्टाईन असे महान तत्वज्ञ निर्माण केले. मँचेस्टर विद्यापीठातून निर्माण झालेल्या या सगळ्या झगमगत्या व्यक्तिमत्त्वांचा उल्लेख करून मायकेल वुड त्यांच्या लेखात पुढे म्हणतात की, “आमच्या विद्यापीठांमधल्या विद्यार्थ्यांनी उत्तम राज्यकर्ते, उत्तम प्रशासक नि या सगळ्या व्यवस्थेला धारण करणारे लोक घडवले.” पुढे ते म्हणतात, “सध्या ‘फेक न्यूज’ हे प्रकरण इतकं हाताबाहेर जात चाललं आहे की, काय खरं नि काय खोटं हेच समजेनासं झालं आहे. पण, आमच्या विद्यापीठाने आमचं जे ‘क्रिटिकल माईंड’ घडवलं आहे, तेच आम्हाला या दुविधेमधून तारून नेणारं मोठं साधन आहे.”

लक्षात येतंय का तुमच्या? ‘फेक न्यूज’ आणि ‘फेक नॅरेटिव्ह’ने जगभर सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. एक गोजिरवाणा अरब मुसलमान पोर्‍या समुद्रकिनार्‍यावर उपडा मरून पडला आहे, हे चित्र असंच ‘फेक नॅरेटिव्ह’ होतं. ज्यामुळे संपूर्ण युरोपीय जनमानस हळहळलं आणि फसलं. त्यांनी आपल्या देशाची दारं सीरियन अरब निर्वासितांसाठी उघडली. आता युरोपीय समाज पस्तावतो आहे. कारण, हे निर्वासित मुसलमान आहेत. त्यांनी आपले गुण उधळायला सुरुवात केली आहे. पण, मायकेल वुड यांना विश्वास वाटतोय की, ‘क्रिटिकल माईंड’च्या बळावर म्हणजे, काय योग्य नि काय अयोग्य, हे कळण्याची शक्ती ज्याच्या मनात विद्यापीठीय शिक्षणाने निर्माण केली आहे, तो युरोपिय समाज त्या मानसिक बळावरच या संकटातून बाहेर पडेल. प्रत्यक्षात काय होईल, हे आपल्याला कळेलच. कारण, ‘ते’ दिन दुगनी, रात चौगुनी या हिशेबात त्यांची लोकसंख्या वाढवत सुटलेत आणि ‘तुमची’ तरुण-तरुणी एक मूल जन्माला घालायलासुद्घा व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली कुरकुर करतायत.

असो. मुद्दा असा की, असं योग्यायोग्य विचार करणारं मन तयारच होऊ नये, अशी पुरेपूर काळजी इंग्रजांनी भारतात शिक्षणव्यवस्था सुरू करताना घेतली. कलकत्ता विद्यापीठ हे आधुनिक भारतातलं पहिलं विद्यापीठ. ते दि. २४ जानेवारी १८५७ या दिवशी सुरू झालं. त्याच वर्षी १८ जुलैला मुंबई आणि ५ सप्टेंबरला मद्रास विद्यापीठ सुरू झालं. ही विद्यापीठं चालू करण्यात, भारतीयांनी आधुनिक शिक्षण घेऊन शहाणं व्हावं, असा मुळी हेतू नव्हताच. उलट, भारतीयांची शिक्षण व्यवस्था आपल्याच हातात एकवटलेली राहावी. त्या व्यवस्थेतून गुलामांची मानसिकता असणारे काळे इंग्रज निर्माण व्हावेत. यथावकाश त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वत: होऊन स्वीकारावा. आपला मूळ धर्म, संस्कृती, इतिहास यांचा त्यांनी मनापासून तिरस्कार करावा. त्यायोगे ब्रिटनचं या देशावरचं साम्राज्य युगानुयुगे अबाधित राहावं, असा हा सूक्ष्म पण जबरदस्त प्रभावी ‘नॅरेटिव्ह’ होता. आजही आहे. आत्ताच व्हॉटसअ‍ॅप समूहावर एक संदेश आलाय. ‘हिंदू हे नाव तुम्हाला आक्रमक, विजेत्या अरबांनी दिलं. मग तुम्ही हिंदूपणाचा अभिमान का बाळगता?’


मल्हार कृष्ण गोखले

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121