जामिनाची मुदत संपताच केजरीवालांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण; म्हणाले, "ही हुकूमशाही..."

    02-Jun-2024
Total Views |
arvind kejrival 
 
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीत प्रचार करण्यासाठी मिळालेली अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले. तुरुंगात जाण्याच्या आधी अरविंद केजरीवाल यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. त्याबरोबरचं त्यांनी हनुमान मंदिरालाही भेट दिली आहे.
 
हनुमान मंदिराला भेट दिल्यानंतर केजरीवाल यांनी पक्ष कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली. पक्ष कार्यालयात केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. केजरीवाल म्हणाले की, "आम आदमी पक्ष महत्त्वाचा नाही, देश महत्त्वाचा आहे. तुमचा मुलगा पुन्हा तुरुंगात जाणार आहे. मी हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे. केजरीवाल यांच्या विरोधात कोणताही पुरावा नसल्याचे मोदींनी मान्य केले."
  
पुढे बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, "केजरीवाल हे अनुभवी चोर आहेत. मी एक अनुभवी चोर आहे हे मान्य. कोणत्याही पुराव्याशिवाय तुम्ही मला तुरुंगात टाकले. प्रचंड बहुमत असलेल्या सरकारला तुम्ही तुरुंगात टाकले. ही हुकूमशाही आहे. ज्याला वाटेल त्याला तुरुंगात टाकले जाईल. मी या हुकूमशाहीविरुद्ध लढत आहे."