पुणे : राष्ट्रवादी काँग्रसच्या शरदचंद्र पवार गटाचे नेत शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिले आहे. पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. यासाठी गांभीर्याने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्याची विनंती त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री शिंदेंना केली आहे.
शरद पवार आपल्या पत्रात म्हणाले की, "मी पुणे जिल्ह्यातील तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागातील गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. अल्प पर्जन्यमान असलेल्या या भागातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी राज्यशासनाने प्रामुख्याने पुरंदर उपसा सिंचन योजना, गुंजवणी प्रकल्प, जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना हाती घेतल्या आहेत. मात्र दौऱ्यावेळी शेतकरी- ग्रामस्थांशी संवाद साधला असता सदर योजनांच्या अंमलबजावणीबाबत अनेक समस्या असल्याचे दिसून आले. जनसंवादावेळी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा याकरिता ग्रामस्थांनी मागण्यांसोबत काही उपाययोजना देखील सुचवल्या."
"पुणे जिल्ह्यातील उपरोक्त तालुक्यांमधील पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे दोनही सन्माननीय उपमुख्यमंत्री तसेच मृद व जलसंधारण मंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठकीचे आयोजन व्हावे," अशी विनंती त्यांनी आपल्या पत्रात केली आहे.