राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणीचा भाग म्हणून राज्यानेही अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला. मनुस्मृती आणि इतर काही विषयांमुळे वादात सापडलेल्या या आरखड्यातील अनेक बाबींवर सखोल चर्चा झालीच नाही. त्यामुळेच हा आरखडा नेमके काय सांगतो आणि सुरु असलेला वाद याविषयी या लेखातून आढावा घेतला आहे...
केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोऱण २०२० जाहीर केल्यानंतर, धोरणातील तरतूदींनुसार मोठ्या प्रमाणावर बदलाच्या दिशेने पाऊले पडू लागली आहेत. गेल्या काही वर्षांत या धोरणात सूचित केलेल्या बदलाप्रमाणे, अंमलबजावणीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. धोरणात सध्याच्या प्रचलित आकृतीबंधात बदल सुचवण्यात आले होते. त्यानुसार स्वतंत्र व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. धोरणात सूचवलेल्या विविध संस्थांच्या निर्मितीचे प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर राज्यांना अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने मार्गदर्शक ठरणार्या, अभ्यासक्रम आराखड्याची निर्मितीदेखील करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्यावतीने आरंभी पायाभूत स्तराचा अभ्यासक्रम आराखडा प्रकाशित केला. त्यापाठोपाठ शालेय स्तराचा अभ्यासक्रम आराखडादेखील प्रकाशित करण्यात आला.
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यापाठोपाठ, राज्य सरकारने अभ्यासक्रम आराखडा नुकताच प्रकाशित केला. राज्याची गरज, पार्श्वभूमी लक्षात घेऊन आपल्या राज्यात स्वतंत्रपणे आराखडा तयार केला जात आहे. राज्याची गरज लक्षात घेऊन आराखडा तयार होणे, ही राज्याच्या शिक्षणप्रक्रियेसाठी अत्यंत चांगली गोष्ट आहे. ‘राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे’ने राज्य अभ्यासक्रम आराखडा, तज्ज्ञांच्या मदतीने विकसित केला आहे. प्रस्तुत आराखडा नागरिकांनी वाचून तो राष्ट्र व राज्याचे हित लक्षात घेऊन, प्रतिक्रियांसाठी खुला करण्यात आला. आराखडा जाहीर झाल्यानंतर आराखड्यातील ’आंतरसमवाय क्षेत्रे’ या प्रकरणात ’मूल्य आणि स्वभाववृत्ती’ या उपप्रकरणात मनुस्मृतीतील श्लोकाचा संदर्भ घेतला गेला. त्याचबरोबर, मनाचे श्लोक, गीता अध्याय पाठांतर या प्रक्रियेचा विचार करण्यात आला. त्यामुळे विविध माध्यमांतून या आऱाखड्यावर जोरदार टीका करण्यात आली. खरेतर, मनस्मृतीचे कोणी समर्थन करणार नाहीच, मात्र मनुस्मृतीतील श्लोक ज्या संदर्भाने वापरलेला आहे, त्याची खरेच गरज होती का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. त्याचवेळी, मराठी आणि इंग्रजीसारख्या भाषांची सक्ती नाही म्हणून देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला. अखेर, मराठी आणि इंग्रजी हे विषय शालेय स्तरावर सक्तीचे असतील, असे जाहीर करण्यात आले. मात्र, हे सर्व घडताना आराखड्यातील इतर गोष्टींकडे मात्र दुर्लक्ष झाले.
हा आराखडा एकूण पाच प्रकरणांत विभाजित करण्यात आला आहे. पहिले प्रकरण, भाग अ मध्ये दृष्टिकोन मांडण्यात आला असून, त्यात शालेय शिक्षणाची उद्दिष्टे आणि अभ्यासक्रम क्षेत्रे, शालेय स्तर तर्क आणि रचना, अध्ययन मानके, आशय, अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकन दृष्टिकोन, वेळेचे नियोजन या घटकांचा समावेश आहे. प्रकरण दोन, भाग ब मध्ये, आंतरसमवाय क्षेत्रात भारतीय ज्ञानप्रणाली, मूल्य आणि स्वभाववृत्त्ती, पर्यावरणविषयक अध्ययन आणि काळजी, शाळांमधील समावेशन, शाळांमध्ये मार्गदर्शन आणि समुपदेशन, शाळेतील शैक्षणिक तंत्रज्ञान या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. प्रकरण तीन, भाग क मध्ये शालेय विषयासंदर्भातील मांडणी करण्यात आली आहे. त्यात भाषा, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्र, कला, आंतरविद्या शाखीय शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि निरामयता, व्यावसायिक शिक्षण, विषययोजना तिसरी ते बारावी घटकांचा समावेश आहे. प्रकरण चार, भाग ड मध्ये शालेय संस्कृती आणि प्रक्रिया या प्रकरणात शालेय संस्कृती, शालेय प्रक्रिया या घटकांचा समावेश आहे. भाग पाच इ मध्ये आराखडा अंमलबजावणीसाठी क्षमता बांधणी, अध्ययन पूरक वातावरणनिर्मिती, शिक्षकांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण, समाज आणि कुटुंबाचा सहभाग या उपघटकांचा समावेश आहे. या आराखड्यात एकूण पाच प्रकरणे आणि २५ घटकांचा समावेश असताना, इतर घटकांवर चर्चा होताना दिसत नाही.
मुळात हा आराखडा तयार करताना चारित्र्यवान, निरोगी, नैतिक, सर्जनशील, संवेदनशील नागरिक घडविणारे, तसेच उच्च शिक्षणाशी सुंसंगत आणि विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणारे शिक्षण हे राष्ट्रीय अभ्यासक्रमाचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे. या अभ्यासक्रम प्रणालीत घडलेले विद्यार्थी सतत नवे ज्ञान मिळवणारे व बदलत्या काळाशी जुळवून घेण्याची क्षमता असलेले तयार केले जातील. सांस्कृतिक, आर्थिक, लोकशाही मार्गांनी समाजात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम व प्रेरित करण्याची अपेक्षा करण्यात आली आहे. अभ्यासक्रम आराखडा तयार करताना २१व्या शतकासाठीची मूल्ये, गाभाघटक, वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचार, सर्जनशीलता,नवनिर्मिती, सौंदर्यशास्त्र, संभाषण, बहुभाषिकता, आरोग्य आणि पोषण, मानसिक, शारीरिक तंदुरुस्ती व निरामयता, सहकार्य, समस्या निराकरण, नैतिकता, मानवी व घटनात्मक मूल्यांची जाण, समानुभूती, नागरिकत्व कौशल्य व मूल्ये, जागतिक नागरिकत्वाकडे जातानाच, भारताविषयी अभिमान बाळगणारा आशय, इत्यादी उद्दिष्टांचा विचार करण्यात आला आहे. भविष्यासाठी शिक्षणाची पेरणी होत असताना, या बाबींचा विचार अधिक गंभीरपणे करावा लागणार आहे. सध्याच्या शिक्षणात माहितीचे ओझे अधिक आहे, असे सातत्याने म्हटले जाते. या आराखड्यातही तेच नमूद केले आहे. या ओझ्याने शिक्षण अधिक निरस होत आहे. त्यासाठी माहितीचे ओझे कमी करण्याबाबत २००५ सालीदेखील भूमिका प्रतिपादित करण्यात आली होती. तिच भूमिका याही आराखड्यात नमूद करण्यात आली आहे. त्यासाठी स्वतःहून ज्ञान निर्मिती करणे, चर्चेव्दारे, विविध आंतरक्रियांव्दारे, विषयातील सखोल संकल्पना, समजतील व महत्त्वाच्या क्षमता, मूल्ये, कौशल्य व प्रवृत्ती विकसित करण्याची अपेक्षा करण्यात आली आहे.
वर्गातील आंतरक्रियेतदेखील बदल सूचित करण्यात आला आहे. प्रश्न विचारणे, चर्चा करणे, वादविवाद, सर्जनशील लेखन कौशल्याची गरज ,अधोरेखित करण्यात आली आहे. सध्या प्रचलित असलेल्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची प्रक्रिया कायम ठेवण्याबरोबर, प्रत्याभरणाचा विचारही व्यक्त करण्यात आला आहे. तथापि, दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये बदलाचा विचार मांडण्यात आला आहे.शालांत परीक्षा म्हणजे घोकंपट्टी व केवळ स्मरणाची परीक्षा असे न राहता, प्राप्त कौशल्यांच्या मूल्यमापनाची अपेक्षा करण्यात आली आहे. वर्षात दोनवेळा मंडळाची परीक्षा देता येण्याची संधी, त्याचबरोबर मागणीनुसार परीक्षा देता येण्याच्या संधीचा विचारही मांडण्यात आला आहे. आकृतीबंधानुसार निश्चित केलेल्या पायाभूत स्तरावर, दोन भाषा शिकणे अपेक्षित असून, प्रथम भाषेत साक्षरता प्राप्त करणे अपेक्षित आहे. पूर्व माध्यमिक स्तरावर, तीन भाषांची शिफारस करण्यात आली आहे. माध्यमिक स्तराचा विचार करता, तेथील चार वर्गांचे दोन स्तर निश्चित केले असून, नववी व दहावीचा एक स्तरावर तीन भाषांचा विचार केला आहे. यातील दोन भाषा भारतीय आणि एक भाषा परदेशी असणार आहे. दुसरा टप्पा अकरावी व बारावीचा आहे. तेथे सध्याच्या प्रचलित असलेल्या, विविध शाखांचा विचार काढून टाकण्यात आला आहे. या स्तरावर अभ्यासक्रमाचे ओझे कमी करून, चिंतनासाठी अधिक वेळ दिला जाईल, असे नमूद केले आहे. येथे विद्यार्थी दोन भाषा शिकतील. त्यातील एक भाषा भारतीय असेल, असे म्हटले आहे. दहावीसाठी असलेल्या अभ्यासक्रम क्षेत्रातील दहाही विषयांची संधी आणि मूल्यांकन करावे लागणार आहे.
धोरणात नमूद केल्याप्रमाणे, व्यावसायिक शिक्षणाचा विचार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची तीन क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यात जीवन शिक्षण प्रक्रिया, यंत्र आणि सामग्रीसह कार्य करणे. मानवी सेवांमध्ये काम करणे अपेक्षित आहे. माध्यमिक स्तरावरील चार वर्षांत पहिल्या दोन वर्षी विद्यार्थी अधिक चांगली व्यावसायिक कौशल्ये, प्रावीण्य संपादन करतील. वयाच्या १५व्या वर्षापर्यंत तीन भाषा अभ्यासाव्या, त्यात दोन भारतीय व एक परकीय असावी, असे म्हटले आहे. शालेय संस्कृती, शालेय प्रक्रिया याबद्दलही विचार करण्यात आला आहे. प्रक्रियेत शाळेचे वेळापत्रक, संमेलन, ग्रंथालयासंबंधित उपक्रम, विद्यार्थी समित्या आणि मंच, कार्यक्रम आणि उत्सव यांचा समावेश असणार आहे. खरेतर, संपूर्ण आराखड्यात अनेक सूक्ष्म गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. मात्र, या सर्व गोष्टी प्रत्यक्षपणे वर्ग आणि शालेय स्तरावर अमंलबजावणी करणे, त्यादृष्टीने प्रक्रिया पुढे घेऊन जाणे काहीसे कठीण आहे. याकरिता मनुष्यबळाची मानसिकता बदलण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.
योग्य शिक्षणासाठी अध्यापन, संसाधने, भौतिक वातावरण आणि व्यवसायिक वकासाने सक्षम केले पाहिजे, अशी भूमिकादेखील प्रतिपादित करण्यात आली आहे. अर्थात, आराखड्यात प्रत्येक स्तरावर अत्यंत उत्तम दर्जाचे शिक्षक असावेत, याबाबत आग्रही भूमिका ़मांडली आहे. माध्यमिकच्या दुसर्या टप्प्यावर अशा सखोल समज व संबंधित विषयात रूची असली पाहिजे. विषयातील शिक्षक तज्ज्ञ असले पाहिजे. आंतरविद्याशाखीय समन्वय साधण्याची क्षमता असायला हवी, असेही म्हटले आहे. एकूणच शिक्षक प्रशिक्षण आणि शिक्षकांची गुणवत्ता यावर अधिक उत्तम भर दिलेला दिसून येतो. शिक्षक व विद्यार्थी यांचे योग्य गुणोत्तर राखणे, व्यवसायिक पात्रतेमध्ये प्रगती करणे, याला शिक्षण व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणून नमूद केले आहे. त्यासाठी सेवापूर्व शिक्षक प्रशिक्षणात कायापालट करण्याची भूमिका प्रतिपादित करण्यात आली आहे. सेवांतर्गत प्रशिक्षणाव्दारे प्रगती करण्याची गरजही, अधोरेखित करण्यात आली आहे. त्याचबरोबर पंचकोष विकासावरदेखील भर देण्यात आला आहे. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोषाच्या संदर्भाने प्रतिपादन करण्यात आले आहे.
त्याचवेळी, पाठ्यपुस्तक केंद्रित असलेली शिक्षणाची प्रक्रिया लक्षात घेऊन, पाठ्यपुस्तकांबद्दलचा दृष्टिकोन बदलण्याच्या भूमिकेचा विचार अधिक महत्त्वाचा आहे. आपले शिक्षण हे पाठ्यपुस्तकावर अवलंबून आहे. त्याशिवाय, इतर प्रकारचे अध्ययन साहित्य, इतर प्रकारची पुस्तके, आणि आजूबाजूच्या वातावरणाचा पुरेपूर वापर करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकांची मर्यादा लक्षात घेऊन एकाधिक संदर्भ पाठ्यपुस्तके उपलब्धतेची गरजही, आराखडा नमूद करत आहे. मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण गरजेचे असल्याचे सांगून, पाठ्यपुस्तकांची किंमत हा महत्त्वाचा घटक आहे हेदेखील अधोरेखित केले आहे. पाठ्यपुस्तकाची तत्वे आणि पाठ्यपुस्तकांमधील महत्त्वाचे घटक कोणते, ते देखील आराखडा नमूद करत आहे. पाठ्यपुस्तक विकासाची प्रक्रिया यावर भाष्य करण्यात आले आहे. खरेतर, शिक्षणशास्त्राच्यादृष्टीने मुले कशी शिकतात, त्यांचा विकास कसा होतो, या पैलुंवर देखील आराखड्यात झोत टाकण्यात आला आहे. शालेय विषयांच्या उद्दिष्टांव्दारे जिंकणे, हारणे यातून मैत्रीपूर्ण भावना, तसेच खेळांमधून लवचिकता, सहवेदना, संवेदनशीलता अशी मूल्य आणि प्रवृत्ती वाढीस लावण्याचा विचारही सुचित केला आहे. शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील सकारात्मक संबंधावर भर देण्यात आला आहे. शिक्षण योजनेचे प्रमुख घटक, शिकण्याच्या पाच पायर्या सूचित केल्या असून, त्यांना पंचपदी म्हटले आहे. गृहपाठाचा विचार नमूद करताना म्हटले आहे की, वर्गात शिकलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती करण्याचा हेतू नाही, तर वेगवेगळ्या संदर्भासाठी त्याचा विचार केला जावा. शिकण्याच्यादृष्टीने भीती आणि शिक्षा या दोन्हींना प्रतिबंध करण्याचे सूचवले आहे.
आराखडा वाचला गेला, तर त्यात माध्यमात चर्चा होत असलेल्या मुद्द्यांच्या विचाराबरोबर, इतर प्रकरणे आणि घटक यांचा विचार महत्त्वाचा आहे. त्या सर्वांचा साकल्याने विचार केला गेला, तर शिक्षणाची प्रक्रिया अधिक गतीमान करण्याचा विचार आणि भूमिका प्रतिपादन करण्यात आली आहे. अर्थात शिक्षणाच्या प्रक्रियेत पाठ्यपुस्तक, शिक्षक, वर्गातील प्रक्रिया, मूल्यमापन, वातावरण, शालेय संस्कृती, परिसर, कुटुंब यांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्याच्यादृष्टीने दिशा दाखवण्याबरोबर, शिक्षण क्षेत्रात काम करणार्या प्रत्येकाला दिशा देणारा विचारही अधोरेखित करण्यात आला आहे. नागरिकांनी ज्या मुद्द्याचा विचार करत विरोध केला आहे, ते वगळले जायला हवे. आऱाखड्यात एकाच संकल्पनेसाठी काही ठिकाणी विविध संबोधानांचा उपयोग करण्यात आला आहे. त्या संकल्पना संबोधासाठी एकाच शब्दांचे उपयोजन करायला हवे. काही ठिकाणी भाषिक क्लिष्टता आली आहे, ती काही प्रमाणात कमी करता आली तर, आराखड्यातून बरेच काही साध्य होऊ शकते. शेवटी उद्याचा समाज ज्या शिक्षणातून घडणार आहे, तो समाज अधिक गंभीरपणे घडविण्याचा विचार करण्याच्यादृष्टीने शिक्षणाच्या प्रक्रियेकडे पाहण्याची गरज आहे. आऱाखडा उद्याच्या शिक्षणाच्यादृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्यायला हवे.