मंत्री लोढा वाराणसी दौऱ्यावर! 'एक भारत-श्रेष्ठ भारत' कार्यक्रमात मोदींना निवडून देण्याचे आवाहन
31-May-2024
Total Views | 25
मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन वाराणसीतील नागरिकांना केले आहे. ते सध्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी केदार घाटावर पूज्य संत आणि समाजसेवकांच्या उपस्थितीत श्री करपात्री धाम येथे आयोजित 'एक भारत-श्रेष्ठ भारत' कार्यक्रमाला संबोधित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या सनातन संस्कृतीचे पुनरुज्जीवन होत असून बनारस हे त्यासाठी केंद्रबिंदू असल्याचे मत यावेळी बोलताना मान्यवरांनी व्यक्त केले. केदारघाट येथील श्री करपात्री धाम येथे स्वामी अभिषेक ब्रह्मचारी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्या उपस्थितीत तसेच युवा चेतना प्रमुख रोहित कुमार सिंह यांनी आयोजित केलेल्या 'एक भारत श्रेष्ठ भारत' कार्यक्रमात विविध मान्यवरांनी संबोधित केले. यावेळी मंत्री लोढा यांनीदेखील आपले मत मांडले.
व्याख्यानावेळी तेलंगणा सरकारचे माजी मंत्री राजेंद्र ईटाळा, ज्येष्ठ पत्रकार सुरेश चव्हाणके, तेलंगणा विधानसभेतील भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते ए. महेश रेड्डी, तेलंगणाचे आमदार रामराव पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.