मी राजकारणात आल्याने काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली : उज्वल निकम
03-May-2024
Total Views |
मुंबई : मी राजकारणात आल्याने काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीका जेष्ठ कायदेतज्ज्ञ आणि मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायूतीचे उमेदवार उज्वल निकम यांनी केली आहे. उज्वल निकम शुक्रवारी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
उज्वल निकम म्हणाले की, "चार पाच दिवसांत माझा राजकारणात जन्म झाला तरीसुद्धा काँग्रेसवाल्यांनी राष्ट्रद्रोही अशी माझी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला. याचाच अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू पूर्णपणे घसरली आहे. हा जनसमुदाय ही उज्वल निकम यांची नाही नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामाची पावती आहे," असे ते म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित होते. ते म्हणाले की, "उज्वल निकम काय आहेत हे जनतेला माहिती आहे. काँग्रेस कशाप्रकारे दहशतवाद्यांची पाठराखण करत आहे हेसुद्धा जनतेला यातून दिसत आहे," असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
उज्वल निकम यांना भाजपने मुंबई उत्तर मध्य लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. दुसरीकडे, या लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीने काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे यावेळी मुंबई उत्तर मध्य लोकसभेत उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड असा सामना रंगणार आहे.