तृणमूल कांग्रेसच्या टेरर मॉडेलचा लोकशाहीस धोका – पंतप्रधान नरेंद्र मोदी

    28-May-2024
Total Views |
Narendra Modi On Trinamool Congress
 
नवी दिल्ली: पश्चिम बंगालमध्ये माणुसकी आणि लोकशाही वाचवणाऱ्यांना धमक्या देण्यात येतात. त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या टेरर मॉडेलचा देशाच्या लोकशाहीस धोका आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील दुमका आणि प. बंगालमधील जादवपूर येथे जाहिर सभांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, कायदा आणि सुव्यवस्थेसारखे मूलभूत काम न करणाऱ्या तृणमूल सरकारला शिक्षा करणे आवश्यक आहे. टीएमसी आणि सुशासनाचा काहीही संबंध नाही. दुर्बिणीतून शोधूनही बंगालमध्ये सुशासन सापडत नाही. पश्चिम बंगालमध्ये माणुसकी आणि लोकशाही वाचवणाऱ्यांना धमक्या देण्यात येतात. त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या टेरर मॉडेलचा देशाच्या लोकशाहीस धोका आहे.
 
झारखंडमधील दुमका येथे जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, इंडी आघाडीस केवळ आपल्या व्होटबँकची चिंता आहे. त्यांचा वनवासी समाजाच्या हिताशी काहीही संबंध नाही. जेथे जेथे हे लोक सत्तेवर आले, तेथे तेथे वनवासी समाज आणि संस्कृती धोक्यात आली. झारखंडमध्ये घुसखोरांचे मोठे संकट उभे ठाकले आहे. संथाल परगणासमोर अनेक घुसखोरांचे आव्हान आहे, परिणामी अनेक भागात वनवासींची संख्या झपाट्याने कमी होत आहे आणि घुसखोरांची संख्या वाढत आहे. इंडी आघाडीचे देशविरोधी राजकारणाचे घातक सूत्र आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.
 
पंतप्रधानांची एएनआयला विशेष मुलाखत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेस लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याच्या मतदानापूर्वी विशेष मुलाखत दिली आहे. यामध्ये पंतप्रधानांनी विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी ओडिशातील बिजू जनता दलाच्या राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभारावर टिका केली आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्ष अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींच्या आरक्षणाविरोधात अफवा पसरवत असल्याचीही टिका त्यांनी केली आहे.