'या' दोन कारणांमुळे भारतातील पत्रकारितेची गळचेपी झाली! नेमकं काय म्हणाले अजय मित्तल?
27-May-2024
Total Views |
मुंबई (प्रतिनिधी) : (Ajay Mittal VSK Dehradun) "स्वातंत्र्य लढ्यात पत्रकारांनी नारदजींच्या विचारांवर काम केले. यात अनेक अडचणी आल्या, पण ते आपल्या कार्यातून डगमगले नाहीत आणि त्यांनी हिंदी पत्रकारिता हे संघर्ष, त्याग, श्रद्धा आणि ताकदीचे प्रतीक बनवले. १९०८-१० मध्ये इंग्रजांनी असे दोन कायदे केले होते जे त्यांनी इंग्लंडमध्ये कधीच केले नव्हते, ते म्हणजे प्रेस ऍक्ट आणि प्रेस इन्साइटमेंट टू व्हायोलन्स ऍक्ट. 'या' दोन कायद्यांच्या आधारे भारतातील पत्रकारितेची गळचेपी झाली.", असा खुलासा प्रज्ञा प्रवाहचे अखिल भारतीय संशोधन समन्वय प्रमुख अजय मित्तल यांनी केला.
देवर्षी नारद जयंतीनिमित्त रविवार, दि. २६ मे रोजी विश्व संवाद केंद्र डेहराडून-उत्तराखंडतर्फे पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, "नारदजी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. भगवान विष्णूच्या मनात काय चालले आहे हे सर्वप्रथम नारदजींना कळते. नारदजी तिन्ही लोकात फिरत असतात. देव, दानव, मानव सर्व सारखेच विश्वासार्ह आहेत. मीडिया जगत आज विश्वासार्हतेच्या संकटाचा सामना करत आहे, त्यांनी नारदजींकडून मानवता शिकली पाहिजे. लोककल्याणात ते सदैव व्यस्त असतात. नारदजी लोककल्याणाच्या उद्देशाने कार्य करतात."
पत्रकारितेवर बोलताना ते म्हणाले, "महात्मा गांधीजींनी वृत्तपत्रांची तीन उद्देश समोर ठेवले होते. प्रसारमाध्यमांसाठी ते आजही तितकेच महत्त्वाचे आहेत जितके ते गांधीजींच्या काळात होते. महात्मा गांधींनी पत्रकारिता केली तेव्हा त्यांनी लिहिले होते की, कोणत्याही वृत्तपत्राचा पहिला उद्देश जनतेच्या भावना समजून घेणे आणि त्यांना अभिव्यक्ती देणे हा असतो. दुसरं म्हणजे समाजात इष्ट भावना पसरवणे आणि तिसरा उद्देश निर्भयपणे सार्वजनिक दोष उघड करणे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही पत्रकारिता आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून देशाला नवी दिशा आणि जागृती देण्याचा प्रयत्न केला, असे ते म्हणाले. एकंदरीत, संघर्षात सर्वांनी पत्रकारितेच्या सहाय्याने देशाला अशा प्रकारे जागृत केले की इंग्रज इथे फार काळ राहू शकले नाहीत."