काँग्रेसचा हात....?

    26-May-2024
Total Views | 86
inc leader channi statement


“ ‘इंडी’ आघाडी सत्तेत आल्यास, भारत आणि पाकिस्तानची सीमा खुली करण्यात येईल,” असे आश्वासनच पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांनी पंजाबवासीयांना दिले. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते. चरणजीत चन्नी हे जालंधरमधून काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. ‘इंडी’ आघाडी सत्तेत आल्यास, पाकिस्तानबरोबर असणारी देशाची सीमा सर्वांसाठी खुली केली जाणार आहे, त्यामुळे पाकिस्तानमधील रुग्णांना भारतात येऊन उपचार करणे सुलभ होणार असल्याचे चन्नी यांचे म्हणणे, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच एका जाहीर सभेत काँग्रेसला ‘पाकिस्तानची तळी उचलणारा पक्ष’ म्हणून संबोधले. खरे पाहता, पंतप्रधान मोदी यांच्या आरोपात तथ्य असल्याचे चन्नी यांनीच आपल्या वरील विधानातून दाखवून दिले आहे. निवडणुकीच्या तोंडावर चन्नी यांना अचानक पाकिस्तानातील आरोग्याच्या समस्या दिसू लागल्या. पण, पाकिस्तानींच्या आरोग्यासाठी, ममत्वभाव बाळगणार्‍या चन्नी यांच्याच मुख्यमंत्रिपदाच्या काळात, पंजाब अमली पदार्थांच्या विषवल्लीचे शिकार झाले होते. या विषवल्लीने पंजाबमधील भविष्यातील एक पिढीच उद्ध्वस्त केली. चन्नी अमली पदार्थाच्या समस्येला ‘न्याय’ देण्यात सपशेल अपयशी ठरले. ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागा’च्या माहितीनुसार, २०२१ साली पंजाबमधील ४२ टक्के गुन्हे हे अमली पदार्थ्यांबाबतचे होते. तसेच देशात अमली पदार्थांच्या सेवनाने होणार्‍या मृत्यूंच्या संख्येत पंजाब देशात अग्रस्थानी होते. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराबाबत राष्ट्रीय सरासरी ही प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे ८० रुग्ण असताना, पंजाबमध्ये ती ९० इतकी आहे. म्हणजेच संपूर्ण पंजाब खर्‍या अर्थाने सुजलाम् सुफलाम् झालेला नसतानाही, चन्नी यांना पाकिस्तानातील नागरिकांची चिंता का सतावते? अगदी अलीकडेच एप्रिल महिन्यात चेन्नईमधील एका रुग्णालयात कराचीमधील आयेशा राशिद हिच्यावर हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. जर पाकिस्तनच्या नागरिकांना भारताकडून वैद्यकीय लाभ मिळत आहेत, तर पाक सीमा खुली करण्यामागे चन्नींचे आणि काँग्रेसचे कोणते छुपे मनसुबे आहेत? त्यामुळे काँग्रेसने नेमका कोणाचा ‘हात’ आपल्या हातात घेतला आहे, हाच खरा प्रश्न!

बिथरलेली काँग्रेस


विरोधकांची ‘इंडी’ आघाडी देशाच्या जनतेलाचा भीती दाखवून भयग्रस्त करत असून, आमचे सरकार दहशतवादाचा सामना निर्भयपणे करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच एका जाहीरसभेत म्हटले आहे. लोकसभेची रणधुमाळी सुरु झाल्यापासून विरोधकांनी प्रचाराची मोहीम आक्रमकपणे उघडली. मात्र, असे असले तरीही त्यात सकारात्मकता असणे आवश्यक असते, हे विरोधक पूर्णपणे विसरले. काँग्रेसच्या ‘न्यायपत्र’ नामक घोषणापत्रात दिलेल्या आश्वासंनावर जनतेला मत देण्यासाठी राजी करण्याचे धाडस दाखवण्यात विरोधकांची आघाडी सपशेल मागे पडली. भारत देशाचे इंग्रजीत असलेले नावच आघाडीला दिल्याने, राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर आपण मोदी आणि भाजपाला शह दिल्याचा समज त्यांनी करून घेतला खरा. पण, या समजाचे रुपांतर सत्यात करण्यात विरोधक नेहमीप्रमाणे अपयशी ठरले. विरोधकांचा संपूर्ण प्रचार हा नकारात्मकतेवर भर देऊन, भ्रम पसरवणारा होता, तर दुसरीकडे भाजपने गेल्या दहा वर्षांतील कामांचा हिशोब घेऊन जनतेकडे मते मागितली. या काळात ‘इंडी’ आघाडीच्या नेत्यांनी ‘मोदी परत आल्यास, भारतात हुकूमशाही येईल’ इथंपासून, मोदी परत आल्यास देशातील आरक्षण रद्द होण्याची भीती जनतेला दाखवून दिली. जेव्हा यातले काहीच चालेनासे झाले, तेव्हा पाकिस्तानकडे असलेल्या अणुबॉम्बची भीतीदेखील त्यांनी जनतेला दाखवली. पण, सरंजामशाही प्रवृत्तीमुळे भाट-चारणांच्या सान्निध्यात राहून, आत्मप्रौढीपणाची स्तुतिसुमने स्वप्रत अर्पण करण्याची सवय असणार्‍या काँग्रेसच्या युवराजांना, सध्याच्या सरकारची दहशतवादाविरोधात केलेली ठोस कामगिरी दिसलीच नसावी बहुदा. दहशतवादाचा बिमोड करताना, ‘झिरो टॉलोरन्स’ नीतीचा अवलंब करताना, काश्मिरात आल्यास एकही दहशतवादी जीवंत परत जाणार नाही, यासाठी सैन्याला पूर्ण सूट दिली. त्यामुळे काश्मीरमधील दहशतवाद कमी झाला असून, आता फुटीरतावादी काश्मीर हळूहळू कात टाकत आहे. पण, देशाचा होणारा विकास मान्य करण्यासाठी लागणारा मनाचा मोठेपणादेखील काँग्रेसकडे नाही. त्यामुळेच बिथरलेली काँग्रेस, आता जनतेला भयभीत करण्यात धन्यता मानताना दिसते.

कौस्तुभ वीरकर 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121