संत एकनाथांचा ‘नित्यविजयी रघुनंदन’ (पूर्वार्ध)

    25-May-2024
Total Views | 80
Sant Eknath
 
संत एकनाथ हे रामाचे बालभक्त होते. संत एकनाथांची साहित्यसंपदा विपुल आहे. त्यामध्ये ‘भावार्थ रामायण’ हा 40 हजार ओव्यांचा मोठा ग्रंथ आहे. पराक्रमी योद्धा श्रीरामाचे वीररसयुक्त दर्शन या ग्रंथातून घडते. मराठी भाषेतील हे पहिले रामायण लिहिण्याचा मान या संत एकनाथांना असून त्यांचा राम हा ‘नित्यविजयी रघुनंदन’ आहे. सलग दोन लेखांत आपण या रघुवीराचे दर्शन घेणार आहोत.

 
शिवाचे निजध्येय। वाल्मिकीचे गुह्य।
एका जनार्दनी एका। श्रीराम निजसखा।
नेणे पदबंधव्युत्पत्ती। रीघ नाही संस्कृती।
लेखणी देवोनि हाती। राम निज कीर्ती लिहिवतो॥
 
श्री ‘भावार्थ रामायण’ या प्रचंड ग्रंथाद्वारे मराठीत पहिली रामकथा लिहून वीररसाच्या संजीवनीने, मृतवत समाजात पुरुषार्थाचे स्फुल्लिंग फुलविणार्‍या संत एकनाथांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव, न्यायमूर्ती रानडे यांनी ‘हे महाराष्ट्राचे खरे नाथ होत’ अशा शब्दांत केला असून तो गौरव सार्थ व समर्पक आहे. महाराष्ट्रीय वैभवशाली संत मंडळींमध्ये 16व्या शतकात श्रीक्षेत्र पैठण येथे होऊन गेलेल्या संत एकनाथ (इ.स. 1533 ते 1599) यांना ‘शांतिब्रह्म’ म्हणून ओळखले जाते. संत बहिणाबाई यांनी भागवत संप्रदायाचे ज्या रूपक अभंगात, ‘ज्ञानदेवे रचिला पाया।’ म्हणत संत ज्ञानदेवांचे आणि ‘तुका झालासे कळस।’ म्हणत संत तुकारामांचा सार्थ गौरव केला आहे; त्याच अभंगात संत एकनाथांच्या अपूर्व कार्याचा गौरव करताना बहिणाबाई म्हणतात - जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत॥ महाराष्ट्रातील ज्ञानदेव-नामदेव प्रणीत भक्ती चळवळीला पुनश्च सुदृढ बळकटी देण्याचे कार्य एकनाथांनी केलेले आहे. एकनाथ उत्तरकालीन संत तुकाराम महाराज यांनीही एकनाथांच्या कार्याची स्तुती करीत त्यांना वंदन केलेले आहे. ‘शरण शरण एकनाथा। पायी माथा ठेविला।’, ‘तुका म्हणे भागवत। केले श्रुत सर्वांशी।’

संतकार्याचे सामाजिक मूल्यमापन करताना ज्येष्ठ विचारवंत प्रा. गं. बा. सरदार म्हणतात - संत एकनाथ आदी संतमंडळाचे कार्य हा केवळ त्यांच्या अत्युत्कट भगवद्भक्तीचा सहजोद्रेक नव्हता, तर वस्तुतः ती धार्मिक प्रबोधनाची एक मोठी चळवळ होती. ज्ञानेश्वरप्रणीत भागवत धर्माचा संदेश त्यांनी समाजाच्या वेगवेगळ्या थरात नेऊन पोहोचविला. लोकांच्या भाषेतील त्यांच्या अभंगवाणीने जातीपातीच्या सीमा ओलांडून मराठी जनमनात प्रादेशिक अस्मितेची भावना निर्माण केली आणि सर्वसामान्य लोकांना उच्चतर जीवनमूल्याची ओळख पटवून देऊन खर्‍या अर्थाने महाराष्ट्र संस्कृतीची मुहूर्तमेढ रोविली. संत तुकोबांचे वंशज व थोर संशोधक चिंतक डॉ. सदानंद मोरे म्हणतात - संत कार्यामुळे भक्ती चळवळीला नवचैतन्य प्राप्त झाले, संत एकनाथ हे कर्ते समाजसुधारक होते.
 
बाल रामभक्त
 
 
पंढरपुरातील विठ्ठलमूर्ती विजयनगरच्या सम्राटांनी विजयनगरला नेऊन ठेवल्यानंतर, आपल्या भक्ती-शक्तीच्या सामर्थ्याने ती मूर्ती सम्राटाकडून परत मिळवून पंढरीस आणण्याचे ऐतिहासिक कार्य, ज्या संत भानुदास महाराजांनी केले, त्या संत भानुदासांच्या कुळामध्ये एकनाथांचा जन्म झाला. नाथांचे संगोपन आजोबा चक्रपाणी यांनी केले. त्यांच्या घराण्यात सूर्योपासना पूर्वपार चालत आली होती. भानुदासांपासून त्यात विठ्ठलभक्ती जोडली गेली. पण, बाल एकनाथांना सूर्योपासना, विठ्ठलोपासनेपेक्षाही ‘राम’ भक्तीचे अधिक आकर्षण-वेड होते. त्यांचे इतर बालसवंगड्यांमध्ये खेळण्यात मन रमत नव्हते. ते एकांतप्रिय होते. पैठणमधील पिंपळेश्वर शिवमंदिरात जाऊन ते तासन्तास बसत असत. सदैव रामनामाचा जप करीत. असे एकनाथ बाल रामभक्त होते.
 
सदा रामनामेचि सारी काळा।
रूचेना जया खेळ जे बाललीला॥

रामायण ः राष्ट्रीय महाकाव्य
 
 
संत ज्ञानदेव-नामदेवप्रणीत भक्ती साहित्य परंपरेला संत एकनाथांनी आपल्या प्रज्ञा-प्रतिभेने समृद्ध केले. ज्ञानदेवाच्या ग्रंथलेखनाचा, भाष्यग्रंथांचा वसा व वारसा एकनाथांनी तितक्याच जोमाने जोपासला व वारकरी भक्ती विचाराला ज्ञानेश्वरीप्रमाणेच, ‘भागवता’वर भाष्य लिहून तात्त्विक अधिष्ठान दिले. ‘नाथ भागवत’ आणि ‘भावार्थ रामायण’ हे एकनाथांचे दोन ग्रंथ म्हणजे मराठी साहित्यातील दोन धवल गौरीशंकर शिखरेच आहेत.एकनाथांचा दुसरा मोठा ग्रंथ म्हणजे ‘भावार्थ रामायण’. वारकरी संप्रदायांचा मंत्रच ‘राम कृष्ण हरी’ असल्याने व एकनाथ हे बाल रामभक्त असल्याने आणि तत्कालीन धर्मांध मुघलांच्या पारतंत्र्यामध्ये खितपत पडलेल्या, निद्रिस्त समाजामध्ये वीरत्वाचे-पुरुषार्थाचे जागरण करण्याच्या हेतूने, काळाची गरज म्हणून एकनाथांना योद्धा रामाचे रघुवीराचे चरित्र ‘भावार्थ रामायण’ ग्रंथाद्वारे समाजापुढे ठेवले. प्रभू रामचंद्रांच्या चरित्रावर म्हणजेच रामायणावर पहिला स्वतंत्र मराठी ग्रंथ लिहिण्याचे कार्य संत एकनाथांनी केले. वाल्मिकी रामायणासह अनेक रामायणे डोळ्यांपुढे ठेवून सात कांडांचे तब्बल 40 हजार ओव्यांची अवाढव्य रचना केली. या सात कांडांतील 40 हजार पैकी 25 हजार ओव्या एकनाथांनी पूर्ण केल्या आणि हे रामायण लिहीत असतानाच त्यांनी जलसमाधी घेऊन आपल्या इहलोकीच्या कार्याला पूर्णविराम दिला. रामनाम चिंतनातच या बाल रामभक्ताच्या जीवनाची अखेर झाली. त्यांच्या दृष्टीने रामायण हे राष्ट्रीय महाकाव्यच होते.

एकनाथ पूर्व संत साहित्यातून होणारे ‘राम दर्शन’ हे भक्ती-आराधना-जप या उद्देशाने प्रेरित आहे. ते ‘राम दर्शन’ प्रामुख्याने परब्रह्म, परमात्मा रामाचे म्हणजेच निर्गुण रामाचे आहे. त्यांच्या अभंगामध्ये रामायणातील काही प्रसंग, घटना त्यांचे केवळ उल्लेख आहेत, ते दाशरथी रामाचे आहेत, पण ते फारच अल्पसे आहेत, त्याचा उद्देशही रामनामाचे सामर्थ्य दाखवून भक्तभाविकांना रामनामाकडे वळविण्याचा पुरता मर्यादित आहे. थोडक्यात, एकनाथपूर्व संत साहित्यातील ‘राम दर्शन’ हे नामस्मरण भक्ती लक्षी आहे.पण, ज्ञानदेव-नामदेवकालीन समाजस्थिती, राजकीय स्थिती वेगळी होती. त्यामध्ये एकनाथ काळात खूपच बदल होऊन सारा महाराष्ट्र धर्मांध मुसलमान बादशहा -सुलतानांच्या ताब्यात गेलेला होता. आपला धर्मपालन करणे हिंदूंना अशक्यप्राय झाले होते. सारा हिंदू समाज धर्मांध अत्याचारापुढे मृतवत झाला होता. अशा मृतवत हिंदू समाजात धर्मांध असुरी शक्तीविरुद्ध स्वधर्म-स्वसंस्कृतीविषयी स्वाभिमान जागृत करण्यासाठी संत एकनाथांनी योद्धा रामाचे पुरुषार्थी, स्वधर्मरक्षक, वीररस परिपूर्ण असे चरित्र लिहिले. ते म्हणजे ‘भावार्थ रामायण’. एकनाथ पूर्व संतांचा ‘परब्रह्म राम’ आणि एकनाथांचा ‘पुरुषार्थी योद्धा राम’ असा फरक आपणास स्पष्ट जाणवतो. भावार्थ रामायण लिहिण्यामागची एकनाथांची प्रेरणा निखळ सामाजिक व राष्ट्रीय आहे. लोकोद्धाराची आहे. म्हणून ते रामायणाला ‘जगदोद्धारक रामकथा’ म्हणतात.॥ जय श्रीराम ॥

विद्याधर ताठे
(पुढील अंकात ः संत एकनाथ (उत्तरार्ध)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121