सांगली : काँग्रेस पक्षातून विशाल पाटील यांची हकालपट्टी करा, अन्यथा इथून पुढे आमच्याकडून मदतीची अपेक्षा करु नका, असा इशारा उबाठा गटाकडून काँग्रेसला देण्यात आला आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील हे पक्षाच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने उबाठा गटाचे नेते संजय विभुते यांनी हा इशारा दिला आहे.
संजय विभुते म्हणाले की, "काँग्रेस शहरचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निवडणूकीनंतर काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यांनी अधिकृत पत्र काढून बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासह सर्वांनी एकत्र येण्याचं आमंत्रण दिलं होतं. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एकमेव सांगली मतदारसंघात काँग्रेसने सुरुवातीपासूनच गद्दारी सुरु केली होती. याबाबतीत आम्ही सातत्याने वरिष्ठ पातळीवर सूचना देत होतो. राष्ट्रवादीनेदेखील सुरुवातीला याठिकाणी आम्हाला मदत करण्याची भूमिका घेतील पण शेवट काय झाला हे सर्वांना माहिती आहे."
"जवळजवळ ७० टक्के राष्ट्रवादी विशाल पाटलांसोबत गेली. काँग्रेस आणि शिवसेना असा वाद असताना राष्ट्रवादी का गेली असा प्रश्न आम्हाला पडला आहे. काँग्रेसच्या जिल्ह्याध्यक्षांनी घेतलेला स्नेहभोजनाचा कार्यक्रम म्हणजे त्यांनी गद्दारी केल्याचा अधिकृत पुरावा दिला आहे. त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी," अशी मागणी त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
"आपण विशाल पाटलांची हकालपट्टी केली नाही याचा अर्थ गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सर्व काँग्रेस विशाल पाटलांसोबत उभी होती, असा अर्थ समजायचा का? येणाऱ्या काळात काँग्रेसला सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडी पाहायची असल्यास त्यांनी तातडीने विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करावी. अन्यथा, सांगली जिल्ह्यात परत महाविकास आघाडी होणार नाही. तसे न केल्यास इथून पुढे सांगलीत शिवसेनेकडून मदतीची अपेक्षा करु नये. आमची लायकी निवडून येणारी नसली तरी तुम्हाला पाडण्याची नक्कीच लायकी आहे," असेही ते म्हणाले आहेत.