कोणत्या दिशेला जायचंय ते राज ठाकरेंनी आधी ठरवावं : उद्धव ठाकरे
18-May-2024
Total Views |
मुंबई : राज ठाकरेंनी कोणत्या दिशेला जायचं ते आधी ठरवावं, अशी टीका उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केली आहे. राज ठाकरेंनी मुस्लिम मतांवरून केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शनिवारी आयोजित महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, "त्या मंचावर जेवढे लोकं होते त्यांनी आधी आपली दिशा ठरवावी. त्यांना कोणत्या दिशेला जायचं आहे, हे त्यांनी निश्चित करावं. कधी इकडे तर कधी तिकडे असे भरकटलेले लोकं ते आहेत," अशी टीका त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर केली.
ते पुढे म्हणाले की, "पवार साहेबांवर पंतप्रधान मोदींनी भटकती हुई आत्मा अशी टीका केली होती. भटकती आत्मा आहे की, नाही ते माहिती नाही. पण त्यांच्यामध्ये संवेदना नसल्याने ते असेच भटकत आहेत. त्यामुळे ते काहीही बोलत आहेत. त्यांनी मलाही नकली संतान म्हटलं आहे. पण त्यांच्या आजूबाजूला बसलेल्यांना हे मान्य आहे का? ते काहीही बडबड करत आहेत," असे ते म्हणाले.
तसेच "ते म्हणतात की, इंडी आघाडी सत्तेत आल्यावर सर्वात आधी राम मंदिरावर बुलडोझर चालवेल. पण असं काहीही होणार नाही. उलट त्यांनी अर्धवट केलेलं राम मंदिराचं काम आमचं सरकार काम पूर्ण करेल," असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.