मुंबई : मशाल चिन्ह घेणं म्हणजे उबाठा गटात प्रवेश करणं आहे. मशालीवर लढून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला वाऱ्यावर सोडायचं का? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. हातकणंगलेच्या जागेसाठी उबाठा गटाने राजू शेट्टींना मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यांनी याला नकार दिला. दरम्यान, राजू शेट्टींनी सोमवारी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलं.
राजू शेट्टी म्हणाले की, "स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कधीही महाविकास आघाडीसोबत जाण्यात रस घेतला नाही. परंतू, मतविभागणी होऊ नये अशी अनेक शिवसैनिकांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी मला मातोश्रीवर जाऊन उद्धवजींची भेट घेण्याची विनंती केली. शिवसैनिकांनी वारंवार केलेल्या विनंतीचा आदर ठेवून मी उद्धवजींना भेटलो. त्यावेळी मी त्यांना महाविकास आघाडीत येणार नाही, असे स्पष्ट सांगितले."
"गेली पाच वर्षे मी या मतदारसंघात मेहनत केल्याने इथून जिंकू शकतो असा मला आत्मविश्वास आहे. पण मला आता कोणत्याही आघाडीशी संबंध ठेवायचे नाही, असं मी त्यांना सांगितलं. तेव्हा त्यांना ते पटलं आणि लवकरच आम्ही याबद्दलची घोषणा करु असं त्यांनी मला सांगितलं. परंतू, अचानक त्यांनी आपला उमेदवार जाहीर केला. तरीही याबद्दल माझी काहीच हरकत नाही. पण त्यांनी पुन्हा मला असा निरोप दिला की, तुम्ही जर मशाल चिन्हावर लढत असाल तर आम्ही इथे उमेदवार उभा करणार नाही," असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "गेली तीन दशके मी शेतकरी चळवळीत असून आयुष्यात कुठल्याही पक्षात गेलेलो नाही. असं असताना मी मशाल चिन्ह घेणं म्हणजे शिवसेनेत प्रवेश करणं. पण मी स्थापन केलेला स्वाभिमानी पक्ष शिवसेनेत विलिन करायचा का? गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला वाऱ्यावर सोडायचं का? त्यामुळे हे माझ्याकडून होणं शक्य नाही असं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं. मशाल चिन्ह घेणं याचा अर्थ शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणे. हे मी कदापी करणार नाही आणि माझ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही," असे ते म्हणाले. तसेच येत्या १५ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.