निवडणुकांपूर्वीच अखिलेश यादव बिथरले! तिकिटांची अदलाबदलीचा प्रयोग सुरू, पराभवाचे भय स्पष्ट

    06-Apr-2024
Total Views |
akhilesh


नवी दिल्ली
: २०२४ लोकसभा निवडणुकीतील तिकीट वाटप अखिलेश यादव यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. एक, दोन नव्हे तर सपाने अनेक जागांवर उमेदवार बदलले आहेत. काही जागांवर तर ३-३ वेळा उमेदवार बदलण्याची वेळ सपावर आली आहे. हा गोंधळ नेमंका काय आहे, हा प्रश्न अनेकांना पडत आहे. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही कोणत्या उमेदवाराचा प्रचार करायचा, याची चिंता सतावत आहे. ही समस्या केवळ एकाच ठिकाणी दिसली नाही, तर अखिलेश यादव यांना लोकसभेच्या अनेक जागांवर अशा समस्यांना तोंड द्यावे लागले.
 
इंडी आघाडीचा भाग असलेल्या समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये ६३ जागांवर निवडणुक लढवणार होती. पण त्यातील एक जागा त्यांनी सोडली. ती जागा म्हणजे, भदोही लोकसभा मतदरासंघ. ही जागा सपाने तृणमूल काँग्रेस दिली आहे. त्यात इंडी आघाडीतील काँग्रेसला योग्य उमेदवार मिळत नाही. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाने इतके उमेदवार बदलले की, त्यांचे कार्यकर्ते चिंतेत आहेत. ही समस्या केवळ उत्तर प्रदेशमध्येच नाही तर तर मध्य प्रदेशातील खजुराहो जागेवरही दिसून आली, जेव्हा इंडी आघाडीच्या बॅनरखाली मिळालेल्या एकमेव जागेवरही दोनदा उमेदवार जाहीर करावे लागले. त्यामुळे सपाने कोणत्या जागांवर उमेदवार बदलले ते पाहू.

मेरठ लोकसभा मतदारसंघ

उत्तर प्रदेशमधील ज्या जागांवर अखिलेश यादव यांनी अनेक वेळा उमेदवार बदलले, त्यापैकी एक म्हणजे मेरठ लोकसभा मतदारसंघ. जिथे समाजवादी पक्षाने तीनदा उमेदवार बदलले. मेरठमध्ये सुरुवातीला सपाने भानू प्रताप यांना तिकीट दिले. त्यानंतर त्यांचे तिकिट कापून सरधनाचे आमदार अतुल प्रधान यांना उमेदवारी देण्यात आली. आणि आता सरतेशेवटी शेवटच्या दिवशी सपाने पुन्हा एकदा मेरठचा उमेदवार बदलला आणि अतुल प्रधान यांच्या जागी सुनीता वर्मा यांना तिकीट दिले.ज्यांनी आज अर्ज भरला होता.

गौतम बुद्ध नगर लोकसभा मतदारसंघ

गौतम बुद्ध नगर (नोएडा) लोकसभेची जागा समाजवादी पक्षासाठी त्रासदायक आहे. येथेही पक्षाने तीन वेळा उमेदवार बदलले आहेत. समाजवादी पक्षाने सर्वप्रथम महेंद्र नगर यांना येथून उमेदवारी दिली. मात्र स्थानिकांचा विरोध पाहता सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी येथून तरुण राहुल अवाना यांना तिकीट दिले. यानंतर पुन्हा दबाव वाढल्याने त्यांनी महेंद्र नगर यांना उमेदवारी दिली.

मिश्रिख लोकसभा मतदारसंघ

अखिलेश यादव यांनी सुरुवातीला रामपाल राजवंशी यांना मिश्रिख लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले होते. मात्र राजवंशी यांनी तब्येत साथ देत नसल्याचे सांगितले. ज्यामुळे यादवांनी राजवंश यांचे पुत्र मनोज राजवंशी यांना तिकीट दिले. मनोज राजवंशी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. अशा स्थितीत अखिलेश यादव यांनी पुन्हा उमेदवार बदलला, मात्र यावेळी त्यांनी मनोज राजवंशी यांच्या पत्नी संगीता राजवंशी यांना तिकीट दिले. अखिलेश यादव यांनी तीनदा उमेदवाराच्या नावाची घोषणा करूनही तिकीट एकाच कुटुंबाला गेले. अशा स्थितीत सपाच्या कार्यकर्त्यांनाही चिंता सतावत आहे.

बागपत

पश्चिम उत्तर प्रदेशातील बागपत लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षानेही आपला उमेदवार बदलला आहे. समाजवादी पक्षाने यापूर्वी मनोज चौधरी यांना येथून तिकीट दिले होते, परंतु त्यांचे तिकीट कापून गाझियाबादचे रहिवासी असलेले आणि दीड दशकापूर्वी साहिबाबाद लोकसभा मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर आमदार असलेले अमरपाल शर्मा यांना तिकीट दिले आहे. अमरपाल शर्मा हे यापूर्वीच्या अनेक निवडणुका हरले आहेत.

मुरादाबाद

मुरादाबाद लोकसभा जागेची उमेदवारी निश्चित करताना समाजवादी पक्षाला चांगलाच घाम गाळावा लागला. आझम खान यांच्या दबावाचा परिणाम असो किंवा आणखी काही असो, अखेर पक्षाने रुचिवीराला उमेदवार म्हणून स्वीकारले आहे. येथून विद्यमान खासदार एसटी हसन यांना तिकीट देण्यात आले, त्यानंतर रुची वीरा यांना चिन्ह देण्यात आले, त्यानंतर एसटी हसन यांना तिकीट देण्यात आले, त्यानंतर दोघांनी अर्ज दाखल केले आणि आता पक्षाने रुची वीरा यांच्या नावे पत्र लिहिले आहे. उमेदवार रुची वीरा असल्याचे सांगत आहेत. या उमेदवारांच्या अदलाबदलीत सपा कार्यकर्तेही निराश झाले.

बिजनौर

बिजनौर लोकसभा जागेवर समाजवादी पक्षानेही आपला उमेदवार बदलला आहे. यापूर्वी सपाने यशवीर सिंह यांना बिजनौर जागेसाठी तिकीट दिले होते, मात्र २४ मार्च रोजी त्यांचे तिकीट रद्द करून दीपक सैनी यांना उमेदवारी देण्यात आली होती.

 
रामपूर

रामपूर लोकसभा जागेवर समाजवादी पक्षात मोठी चुरस होती. येथे अखिलेश यादव आणि आझम खान यांच्यातच मुख्य लढत होत असल्याचे दिसते. अखिलेश यादव यांनी मुहिबुल्ला मदनी यांना रामपूरमधून उमेदवारी दिली आहे. या बदल्यात सपाच्या जिल्हा शाखेने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. असीम रझा यांनी औपचारिकपणे उमेदवारीही दाखल केली होती. मात्र, त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला असून अखिलेश यादव यांनी निवडलेले मदनी हेच पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे बोलले जात आहे.

बदाऊन

शिवपाल सिंह यादव यांना येथून निवडणूक लढवायची नाही, उलट ते त्यांचा मुलगा आदित्य यादव यांना तिकीट मागत आहेत, अशी बातमी बदाऊन लोकसभा मतदारसंघाबाबत आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते असेही म्हणाले होते की, बदाऊन लोकसभा मतदारसंघ युवा नेतृत्वाकडे द्याला हवा. बदायूंतील उमेदवार अद्याप बदलला नसला तरी शिवपाल यादव यांची उंची लक्षात घेता अखिलेश यादव यांना नकार देणे शक्य दिसत नाही. अशा स्थितीत उशिरा का होईना येथेही उमेदवार बदलू शकतो.

खजुराहो

समाजवादी पक्षाने अलीकडेच खजुराहो मतदारसंघातून मनोज यादव यांना मध्य प्रदेशातील २९ जागांपैकी एका जागेवर उमेदवारी दिली होती. दोन दिवसांनी मनोज यादव यांचे तिकीट रद्द केल्यानंतर समाजवादी पक्षाने मीरा दीप नारायण यादव यांना खजुराहो मतदारसंघातून उमेदवारी दिली. मीरा यादव या दीप नारायण यादव यांच्या पत्नी आहेत, त्या उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील गरौथा विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेल्या आहेत. आता मनोज यादव यांना सामावून घेण्यासाठी त्यांना मध्य प्रदेशात पक्षाध्यक्ष करण्यात आले आहे.