मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उद्योगविश्वाचे आरबीआयच्या पतधोरण निकालाकडे लक्ष लागलं होते. आज तो क्षण आला असून आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी सलग सातव्यांदा रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.याआधी ३ ते ५ एप्रिल या तीन दिवसीय पतधोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला असल्याचे शक्तिकांता दास यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.
हा 'जैसे थे' रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम राहणार आहे. रेपो दर म्हणजे नक्की ज्या दरात आरबीआय बँकांना कर्जवाटप करते. त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही वाढीव व्याजदरावर कर्ज घेण्याची चिन्हे धुसर झाली आहेत. सहा सदस्यीय समितीत ५:१ या बहुमताने रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्स व्यासपीठावर जनेतला उद्देशून आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी ही घोषणा केली आहे.
रेपो दरात काय बदल होऊ शकतो यावर अनेक वृत्तसंस्थांनी सर्व्ह घेतले होते त्यात बहुतांश अर्थतज्ज्ञांनी रेपो दर स्थिर राहू शकेल ही शक्यता बोलून दाखवली होती. कालानुरूप ते योग्य ठरत रेपो दर स्थिर राहिला आहे. शक्तिकांता दास यांनी बोलताना महागाई दर स्थिर असल्याचे सांगितले आहे. पहिल्या तिमाहीत हा महागाई दर ४.९ टक्के,दुसऱ्या तिमाहीत ३.८ टक्के किरकोळ महागाई दर (Retail Inflation) राहणार असल्याचे दास यांनी सांगितले आहे. २ ते ६ टक्के महागाई दर हे आरबीआयची मूल्यमापनाची पातळी आहे.
याव्यतिरिक्त मुख्य महागाई आरबीआयच्या पातळीखाली असला तरी खाद्यपदार्थ व भाजीपाला यांच्यातील महागाई दर चिंतेचा विषय असल्याचे दास यांनी बोलताना सांगितले आहे. वैश्विक अर्थव्यवस्था हि स्थिर व गतीशील राहण्याची चिन्हे असून आर्थिक वर्ष २०२४ मध्ये अर्थव्यवस्था तेजीत राहील असे स्पष्ट संकेत दास यांनी बोलताना दिले आहेत.आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताचा सकल देशांअंतर्गत उत्पादन (GDP) हा ७ टक्के राहिल असा विश्वास गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी यावेळी व्यक्त केला आहे.या आर्थिक वर्षी महागाई दर ४.५ टक्क्यांपर्यंत राहू शकतो असाही अंदाज बँकेने व्यक्त केला आहे.
या व्यतिरिक्त स्मॉल फायनान्स बँकांना फ्युचरसाठी व्याजदर प्रोप्रायटर हेजिंगसाठी वापरण्यास परवानगी होती परंतु रुपये व्याजदराचे डेरिएटिव प्रोडक्ट वापरण्याची परवानगी दिल्याचे दास यांनी स्पष्ट केले आहे. आर्थिक चणचणीतील काळात व्याजदर ठरवण्याची परवानगी स्मॉल फायनान्स बँकांना घेता येणार आहे. थोड्याच वेळात रिझर्व्ह बँकेने एलसीआर फ्रेमवर्क बाबत परिपत्रक आरबीआय काढणार असल्याचे दास म्हणाले आहेत.
त्यांनी सांगितलेल्या महत्वाच्या मुद्यात, आता थर्ड पार्टी अँपला पीपीआय वॉलेटमधून युपीआय पेमेंट करता येणार असल्याचे देखील सांगितले आहे. आरबीआयने अर्थव्यवस्था स्थिर व गतीशील राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे देखील यावेळी नमूद केले आहे. याशिवाय आपल्या भाषणात आरबीआयच्या वित्तीय धोरणातील अनेक मुद्यांवर शक्तिकांता दास यांनी भाष्य केले आहे. रेपो दरात बदल न झाल्यामुळे ग्राहकांना कर्जाच्या व्याजदरात कुठलाही बदल न होणार असल्याने दिलासा मिळाला आहे.