व्यक्तीच्या मृत्यूनंतर अर्धी संपत्ती सरकारने जप्त करावी - राहुल गांधींच्या सल्लागाराने मांडली नवीन योजना

    24-Apr-2024
Total Views |
RAHUL GANDHI
 
नवी दिल्ली : काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी मृत्यूनंतर लोकांची अर्धी संपत्ती जप्त करण्याचा कायदा करण्याची मागणी केली आहे. त्यांनी यासाठी अमेरिकन कायद्याचा हवाला दिला आहे. मालमत्तेचे सर्वेक्षण करून त्याचे पुनर्वितरण करण्याचे राहुल गांधींच्या आश्वासनादरम्यान पित्रोदा यांचे विधान आले आहे.
 
मीडियाशी बोलताना ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा म्हणाले, “अमेरिकेत वारसा कर आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे १०० दशलक्ष डॉलर्स असतील आणि तो मेल्यावर त्यातील ४५ टक्के आपल्या मुलांना देऊ शकतो, तर ५५ टक्के सरकारी तिजोरीत जातो. या कायद्यानुसार तुम्ही तुमच्या काळात संपत्ती निर्माण केली आणि आता ती जनतेवर सोडा. संपूर्ण नाही, तर किमान अर्धा भाग जनतेसाठी सोडला पाहिजे. हे मला परिपूर्ण वाटते." असे सॅम पित्रोदा म्हणाले.
 
यानंतर या कायद्याची बाजू मांडताना सॅम पित्रोदा म्हणाले, "भारतात असा कोणताही कायदा नाही, भारतात जर कोणाकडे १० अब्ज डॉलर्स (सुमारे ८२,००० कोटी) असतील आणि तो मेला तर त्याच्या मुलांना संपूर्ण १० अब्ज डॉलर्स मिळतील. त्यातून जनतेला काहीच मिळत नाही. हे काही मुद्दे आहेत ज्यावर चर्चा आणि विचार केला जाईल. जेव्हा आपण संपत्तीचे पुनर्वितरण करण्याबद्दल बोलतो तेव्हा याचा अर्थ नवीन कायदे आणि धोरणांबद्दल बोलणे असा होईल.
 
सॅम पित्रोदा यांचा आरोप आहे की, भारतातील लोक आपल्या नोकरांना पैसे देत नाहीत तर ते पैसे दुबई आणि परदेशात फिरण्यासाठी वापरतात. काँग्रेस सत्तेत आल्यास नोकर आणि घरकामगारांना किती पैसे द्यायचे याचेही नियम बनवणार असल्याचे ते म्हणाले. उल्लेखनीय आहे की, काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने देशातील जनतेच्या मालमत्तेच्या सर्वेक्षणाबाबत बोलत आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातही सर्वेक्षणाबाबत बोलले गेले आहे.
 
सर्वेक्षणानंतर मालमत्तेचे पुनर्वितरण केले जाईल, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या या निवडणुकीच्या अजेंड्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लाबोल केला आहे. काँग्रेसला महिलांकडून मंगळसूत्र हिसकावून घ्यायचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या मालमत्ता वितरण योजनेला सोशल मीडियावर मोठा विरोध होत आहे.