"कृषीमंत्री असताना पवारांनी कायदा केला असता तर..."; अजित पवार गटाचा टोला
17-Apr-2024
Total Views |
पुणे : कृषीमंत्री असताना शरद पवारांनी कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे. तसेच तुम्ही लक्ष दिलं असतं तर माझ्या तालुक्याचा कायापालट झाला असता, असेही ते म्हणाले.
दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, "आमची पवार साहेबांकडे अपेक्षा होती. तुमच्याकडे एवढी मोठी केंद्राची सत्ता होती. तुम्ही केंद्राचे कृषीमंत्री होतात. त्यावेळी एखादा कायदा करुन ठेवला असता तर आज कांद्याचे आणि दुधाचे भाव पडले नसले. मी तुमच्या पक्षाचा तीनवेळा आमदार झालो. तुम्ही कधीतरी घेऊन बसलात का? तुमचं काय काम आहे, असंही तुम्ही कधी विचारलं नाही. तुम्ही सांगितलं असतं तर माझ्या तालुक्याचा चेहरामोहरा बदलून कायापालट झाला असता," असे ते म्हणाले.
यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, "शरद पवारांनी देशातल्या कृषीखात्याला लावलेल्या वळणामुळेच आज कृषी खात्यात आमुलाग्र बदल झाला असून देश निर्यातीपर्यंत पोहोचला आहे. तुमचं सरकार निर्यातबंदी करत असताना तुम्ही झोपा काढत होता का? तुम्ही त्यांना विरोध का केला नाही?," असा सवाल त्यांनी केला आहे.