विकसित भारताच्या संकल्पासाठी मतदान करण्याचे मोदींचे आवाहन
10-Apr-2024
Total Views |
मुंबई : "मोदीचा 'रामराम' महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचवा. घराघरातील माता-भगिनी, वडिलधारी माणसे आशीर्वाद देतील. तीच माझ्यासाठी ऊर्जा असेल", असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. महायुतीचे रामटेकमधील उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ आयोजित 'विजय संकल्प' सभेत ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. "प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि श्री रघूजी भोसले महाराजांच्या शौर्याचा वारसा लाभलेल्या रामटेकच्या भूमीला माझा साष्टांग नमस्कार", अशी सुरुवात करीत पंतप्रधान मोदींनी उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले, १९ एप्रिलला नुसता खासदार निवडायाचा नाही, तर पुढील १ हजार वर्षांसाठी नव्या भारताचा पाया भक्कम करायचा आहे. विकसित भारताच्या संकल्पासाठी मतदान करायचे आहे.
मीडियात सध्या लोकसभा निवडणुकीचे विविध सर्व्हे दाखवले जात आहेत. त्यात 'एनडीए'चा बंपर विजय दिसत आहे. पण, या सर्वेक्षणासाठी इतका खर्च का करता? जेव्हा मोदींना आई-वडिलांवरून शिव्या वाढत जातील, ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले जातील, तेव्हा समजून जा, 'फिर एक बार मोदी सरकार'. मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आला, तर लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल, असा आरोप इंडी आघाडीवाले करीत आहेत.
मी जेव्हापासून राजकारणात आलो, तेव्हापासून एकही निवडणूक अशी झाली नसेल, ज्यात ही कथा सांगितली गेली नसेल. त्यामुळे त्यांना मी एकच विचारू इच्छितो, आणीबाणीच्या काळात लोकशाही आणि संविधान धोक्यात आले नव्हते का? पूर्वेपासून पश्चिम आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत यांच्याच कुटुंबीयांचा कब्जा होता. आता गरिबाचा मुलगा पंतप्रधान झालेला पाहून पोटात दुखू लागले आहे, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
देशाच्या विभाजनाचा इंडी आघाडीचा डाव
'काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही', अशी म्हण मराठीत प्रचलित आहे. त्याप्रमाणे माझ्यावर कितीही हल्ला करा, मोदी देशातील जनतेच्या सेवेच्या संकल्पापासून मागे हटणार नाही. इंडी आघाडीवाले पूर्ण ताकदीने देशातील जनतेला विभाजित करण्याच्या प्रयत्नांत आहेत. कारण, त्यांना माहिती आहे, की लोक एकत्र आले तर यांची खैर नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांनी एकजूट होऊन देशाच्या नावावर मत द्या. इंडी आघाडीवाल्यांचे प्रयत्न सफल झाले, तर ते देशाचे तुकडे करतील, असेही मोदी म्हणाले.
काँग्रेसने बाबासाहेबांचे राजकारण संपवले
- स्वातंत्र्याप्राप्तीपासूनच काँग्रेसने अनुसुचित जाती-जमाती, आदिवासींना हक्कांपासून वंचित ठेवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाला संपवले. त्यांना भारतरत्न पुरस्कारापासून वंचित ठेवले. भाजपाचे सरकार सत्तेवर आले, तेव्हा त्यांना हा सन्मान देण्यात आला. २०१४ मध्ये एका दलित घरातील मुलगा राष्ट्रपती झाला, २०१९ मध्ये आदिवासी समाजातील महिला या पदावर बसली.
- 'सबका साथ, सबका विकास' हा मंत्र संविधानाप्रतीची खरी भावना आहे. परिवारवादी पक्षांनी संविधानाचा अपमान केला. हे लोक स्वतःच्या घराण्यांना मोठे करण्यासाठी झटले. यांच्या सत्ताकाळात अनेक दशके एससी, एसटी आणि आदिवासी त्यांच्या मूळ हक्कांपासून वंचित होते. त्यांचे दुःख दूर करण्याचे काम या गरीब मातेच्या पूत्राने (मोदी) केले. हाच खरा सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
'एक देश, एक संविधान' लागू करायला ७० वर्षे का लागली?
काँग्रेसने 'एक देश, एक संविधान' लागू केले नाही. त्यांच्यासाठी संविधान इतके महत्त्वाचे आहे, तर मग बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला संपूर्ण हिंदुस्थानात लागू करण्याची हिंमत का केली नाही? ७० वर्षे संविधान संपूर्ण भारतात लागू नव्हते. मोदीने काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत संविधान लागू केले. काँग्रेसने दहशतवादाला खतपाणी घालणारे कलम ३७० हटवले नाही. मोदीने ते हटवले. बाबासाहेब जिथे कुठे असतील, तेथून मोदीला आशीर्वाद देत असतील. काँग्रेस आज 'सीएए'चाही विरोध करीत आहे. त्याचे सर्वाधिक लाभार्थी दलित आणि नवबौद्ध आहेत. काँग्रेसवाल्यांनी कितीही विरोध केला, तरी 'सीएए'अंतर्गत सर्वांना हक्काचे नागरिकत्व मिळणारच, अशी ठाम भूमिका मोदींनी मांडली.