मुंबई : मुंबईतील विविध यंत्रणांनी पावसाळ्याच्या काळात सखल भागातील पाणी साचण्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सज्ज रहावे. अशा स्थितीचा सामना करण्याची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेसह मुंबईतील सर्व यंत्रणांची आहे. पावसाळ्यात सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय राखून योगदान दिल्यास कोणतीही आव्हानात्मक स्थिती एकत्रित प्रयत्नाने टाळता येईल. सर्व यंत्रणांनी पावसाळापूर्व कामांमध्ये चोख भूमिका बजावावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सर्व यंत्रणांना केले.
यंदाच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध यंत्रणांमध्ये सुयोग्य समन्वय साधला होण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि. १० एप्रिल रोजी महानगरपालिका मुख्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीला मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, डॉ. सुधाकर शिंदे, पोलीस सह आयुक्त (वाहतूक)प्रवीण पडवळ, महानगरपालिकेचे सहआयुक्त मिलिन सावंत, चंद्रशेखर चोरे यांच्यासह सातही परिमंडळांचे उप आयुक्त, सहायक आयुक्त, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यासोबतच मध्य व पश्चिम रेल्वे, भारतीय हवामान विभाग, भारतीय तट रक्षक दल, नौसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद प्राधिकरण (एनडीआरएफ), मुंबई वाहतूक पोलिस, महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा), राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी), मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व वाहतूक (बेस्ट), टाटा पॉवर, अदानी एनर्जी आदींच्या प्रतिनिधींसह विविध संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीस हजर होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
उपनगरीय रेल्वे सेवा अव्याहतपणे सुरू रहावी
रेल्वे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने गतवर्षीच्या पावसाळ्यात अतिशय उत्तम समन्वय साधून कामकाज केल्याने उपनगरीय रेल्वे सेवा अव्याहतपणे सुरू होती. रेल्वे हद्दीमध्ये मायक्रो टनेलिंग आणि कलव्हर्टच्या स्वच्छतेची कामे चांगली झाल्यानेच हे शक्य झाले. त्याचबरोबर पावसाच्या पाण्याचा संथ गतीने निचरा होणाऱ्या ठिकाणी भूमिगत जल - साठवण टाक्यांची उभारणी केली. यंदाही त्याच धर्तीवर उत्तम समन्वयाने सर्व कामे करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच, रेल्वेमध्ये सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा सज्ज ठेवावी. रेल्वे परिसरातील वृक्ष छाटणी मोहीम मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी उद्यान विभागाला दिल्या.
मुंबईत ४८१ ठिकाणी पाणी उपसा करणारे पंप
जोरदार पावसाच्या काळात सखल भागांमध्ये पाणी उपसा करणारे पंप लावले जातात. यंदादेखील शहर आणि उपनगरात मिळून ४८१ ठिकाणी पंप लावण्यात येणार आहेत. त्यासाठी जिओ टॅगिंगचा वापर करावा. एखादा पंप जर वेळेत व योग्य प्रकारे कार्यरत झाला नाही, तर संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार आहे.
विभाग पातळीवर सुसज्ज नियंत्रण कक्ष
मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात २५ विभाग पातळीवर नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. हे समर्पित नियंत्रण कक्ष सर्व उपकरणांसह सुसज्ज ठेवावे.
दरडी कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणी उपाययोजना
मुंबईत पूर्व उपनगरांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका असलेली संभाव्य ठिकाणे आहेत. याठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याचे काम विविध यंत्रणांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर योग्य समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच, डोंगरमाथा, डोंगरउतारावर राहणा-या रहिवाशांना नोटीस बजवाव्यात व सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना द्याव्यात. त्यांना आपत्तीसमयीचे प्रशिक्षण द्यावे, असे निर्देशदेखील आयुक्तांनी दिले.
राडारोडा उचलावा रस्ते वाहतूक सुरळीत करावी
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीतील विविध कामे आणि मेट्रो रेल्वे इत्यादी प्रकल्पांच्या ठिकाणी कोणताही राडारोडा पडून राहणार नाही, याची जबाबदारी संबंधित यंत्रणेने घ्यावी. प्रत्येक विभागातील सहायक आयुक्तांनी आपल्या विभागातील राडारोडा काढण्यासाठीचा समन्वय त्या-त्या यंत्रणेशी साधावा. तसेच, वाहतूक पूर्ववत होण्याकामी, स्थानिक कामे झाल्यावर बॅरिकेड्स काढावीत, याबाबतची माहिती संबंधित यंत्रणांना द्यावी, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या.
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग देखभाल काटेकोरपणे
मुंबई पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवरील देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे आहे. त्यामुळे दोन्ही द्रुतगती मार्ग सुस्थितीत असावेत, याची खबरदारी मध्यवर्ती यंत्रणेसह सहायक आयुक्त आणि उप आयुक्तांनी घ्यावी. द्रुतगती मार्गावर कामाची देखरेख विभागीय पातळीवर काटेकोरपणे व्हावी, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
एनडीआरएफ, भारतीय नौदल, अग्निशमन दलाला सज्ज राहण्याच्या सूचना
मुंबईत आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्यासाठी एनडीआरएफचे ३ पथक सज्ज असणार आहेत. तर पूर्व उपनगरासाठी अतिरिक्त पथक तैनात ठेवण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी दिल्या. भारतीय नौदलाला त्यांची पथके आणि पाणबुडे (डायव्हर्स) यासह सुसज्ज राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. अग्निशमन दलाने आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश आयुक्तांनी बैठकी दरम्यान दिले.