नागपूर : मावळमध्ये गोळीबार झाला त्यावेळी किंवा पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये गोवारींचा मृत्यू झाला त्यावेळी कुणाचं सरकार होतं? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुप्रिया सुळेंना केला आहे. सुप्रिया सुळेंनी गृहविभागावर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मावळमध्ये गोळीबार झाला त्यावेळी कोणाचं सरकार होतं? किंवा राज्यातील ११३ गोवारींचा पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला तेव्हाचं सरकार कोणतं होतं. सुप्रियाताई सध्या विरोधी पक्षाच्या मोडमध्ये असल्याने त्या रोज असं वक्तव्यं करतात. त्यामुळे फार एवढं गांभीर्याने घेण्याचं कारण नाही," असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, "ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरीजींसारख्या राष्ट्रीय नेत्याला ही ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो, असं सांगण्यासारखं आहे. खरंतर गडकरी साहेब हे आमचे मोठे नेते आहे. जेव्हा महाराष्ट्राचा नंबर येईल तेव्हा ते नागपूरमधून लढतील. ज्यावेळी पहिली यादी झाली त्यावेळी आमच्या महायुतीचा निर्णय झाला नसल्याने महाराष्ट्राच्या जागांबाबत आम्ही चर्चा केली नाही. ज्यावेळी चर्चा होईल तेव्हा सर्वात आधी नितीन गडकरींचं नाव येईल. त्यामुळे उद्धवजी स्वत:ला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांचं हसं होत आहे," असे ते म्हणाले.
मराठा आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाल की, "मागच्या वेळी जेव्हा उच्च न्यायालयाने आम्ही दिलेलं मराठा आरक्षण वैध ठरवलं होतं, त्यावेळी न्यायालयाने असेच निर्देश दिले होते. तुम्ही ज्या भरती करणार आहात त्या आमच्या अधीन राहून करा, असं न्यायलयाने म्हटलं होतं. त्यामुळे उच्च न्यायालयाची ती प्रक्रियाच असते," असेही ते म्हणाले.